गोदावरीच्या लाभक्षेत्रातील शेतीच्या पाण्यासाठी स्वपक्षातच बंडाचे निशाण हाती घेऊन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांनी नाशिक व नगर जिल्हय़ांतील धरणांमधील पाणी जायकवाडीला सोडण्यास स्पष्ट विरोध केला आहे. जलसंपदा खाते सुनील तटकरे यांच्याकडे असले तरी निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार हेच करतात, तरीही कोपरगाव तालुक्यावर मोठा अन्याय होत असल्याची खंत कोल्हे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
कोपरगाव तालुक्याच्या हक्काच्या ११ टीएमसी पाण्यासाठी कोल्हे यांनी ‘जेलभरो’ आंदोलन करण्याचा तसेच न्यायालयीन लढाई लढण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यात प्रथमच राष्ट्रवादीच्या एका दिग्गज नेत्याने उघडपणे बंड पुकारले आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना सर्वात प्रथम खंबीरपणे साथ देऊन त्यांच्या पाठीशी उभे राहणारे कोल्हे यांनी पक्षाच्या व्यासपीठावर पाणीप्रश्न न मांडता थेट जिव्हाळ्याच्या प्रश्नावर कोल्हे यांनी जलसंपदामंत्री तटकरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. सर्वपक्षीय शिष्टमंडळही त्यांच्याकडे नेले होते. मात्र तटकरे यांनी कोणतीही ठाम भूमिका घेतली नाही. त्यामुळे आता थेट तटकरे यांच्या भूमिकेलाच त्यांनी विरोध केला आहे. कोल्हे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कोल्हे म्हणाले, आगामी काळात गोदावरी कालव्याद्वारे शेतीसाठी व पिण्याचे पाणी कोपरगाव तालुक्याला मिळेल की नाही याची शाश्वती राहिलेली नाही. ऊध्र्व गोदावरी खोऱ्यातील लाभधारक शेतकऱ्यांना मागील हंगामात पिकांना पाणी दिले नाही, त्याचे कारण औरंगाबाद उच्च न्यायालयात दारणा धरणाबद्दलची व पाण्याची चुकीची माहिती दिल्यामुळे न्यायालयाने आमचे ३ टीएमसी पाणी जायकवाडीस दिले, त्याचा परिणाम हजारो एकरावरील उभी पिके फळबागा, ऊस जळून गेला, त्यामुळे शेतकऱ्यांचे १ हजार ४३४ कोटी रुपयांचे नुकसान झाले. संजीवनी व कोळपेवाडी साखर कारखान्याचे देखील कित्येक कोटींचे नुकसान झाले. त्याला गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ जबाबदार आहे. गेल्या ८० वर्षांत पावसाळय़ात गोदावरी कालवे अखंडपणे चालू आहेत व ते ११० दिवस पावसाळय़ात चाललेले आहेत. असे असताना पाटबंधारे खाते गोदावरी नदीपात्रात ४ हजार क्युसेक्सने पाणी जायकवाडीसाठी सोडते. मात्र उभ्या पिकांना पाणी देण्याची मागणी असताना ती सोयीस्कररीत्या टाळली जाते, ही सापत्नभावाची वागणूक का असा सवाल त्यांनी केला.
यंदा गोदावरी कालवे बंद ठेवून त्याचे पाणी नदीद्वारे जायकवाडीला सोडले, असे पाप पूर्वी कधीही घडले नाही असे कोल्हे म्हणाले. जलसंपदामत्री तटकरे, नाशिक पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता यांच्याकडे उभ्या असलेल्या पिकांना ओव्हरफ्लोचे पाणी द्यावे म्हणून मागणी केली असता त्यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाची परवानगी पाहिजे असे सांगितले. दारणा धरणात ६८ टक्के पाणीसाठा असताना गोदावरी कालव्यात पाणी दिले जात नाही हे खेदजनक आहे असे ते म्हणाले.
जायकवाडी ४० टीएमसीचेच!
केंद्रीय मध्यवर्ती संकल्पचित्र संघटनेने जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्राचा अहवाल दिला होता, की हे धरण ४० टीएमसी क्षमतेचे आहे, मात्र त्याची राजकीय व चुकीची आकडेवारी सादर करून ते धरण ७५ टीएमसीवर नेले, मात्र धरण हे ४० टीएमसी क्षमतेचे आहे व ते गृहीत धरावे. त्याची मुख्य मूळ पत्रेही आता गायब केल्याचा आरोप कोल्हे यांनी करून नगर-नाशिक जिल्ह्य़ाचे हक्काचे पाणी काढून घेण्याचा हा खटाटोप केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.