नांदेड: नांदेड जिल्ह्यातील दोन्ही ग्रामीण जिल्हाध्यक्षांची निवड-नियुक्ती थांबवून भारतीय जनता पार्टीने नांदेड शहराचे हंगामी महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांना पुढील तीन वर्षांसाठी या पदावर कायम केले आहे. काँग्रेस पक्षात सलग दोनवेळा विधान परिषदेवर राहिलेले राजूरकर हे खासदार अशोक चव्हाण यांचे निकटवर्ती असून गतवर्षी चव्हाण यांच्यासोबतच त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. ते या पक्षाकडून विधान परिषदेवर जाण्यासाठी इच्छुक होते. पण भाजपा नेतृत्वाने त्यांची पक्षसंघटनेतील पदावर वर्णी लावल्यानंतर त्यांच्या स्थानिक पातळीवरील समर्थक व मित्रांनी मंगळवारी दुपारी आनंद व्यक्त केला.

मागील काही महिन्यांपासून भारतीय जनता पार्टीत ‘संघटनपर्व’ सुरू होते. बूथ कमिट्या, बूथ अध्यक्ष आणि मंडळ अध्यक्ष यांच्या निवडीसाठी पक्षाच्या प्रदेश निवडणूक अधिकाऱ्यांनी कार्यपद्धती निश्चित करून दिली होती. नंतर केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशावरून जिल्हाध्यक्षांच्या निवडीसाठी अर्हताही ठरविण्यात आली होती. त्यानुसार संपूर्ण प्रक्रिया पार पडली किंवा कसे, हा संशोधनाचा विषय झाला असला, तरी भाजपातील शिस्तीला अनुसरून त्यावरून नांदेड जिल्ह्यात तरी आरोप-प्रत्यारोप झाले नाहीत.

भाजपाचे नांदेडसाठी तीन संघटनात्मक जिल्हे असून ग्रामीण भागाची विभागणी दक्षिण आणि उत्तर या दोन जिल्ह्यांमध्ये करण्यात आली आहे. महानगराध्यक्षालाही जिल्हाध्यक्षाचाच दर्जा आहे. या तीन जिल्हाध्यक्षांच्या निवडीच्या अनुषंगाने गेल्या महिन्यात पक्षातर्फे तीन निरीक्षक येथे आले होेते. त्यांनी पक्षाने निश्चित करून दिलेल्या सर्व संबंधितांची मते जाणून घेतल्यानंतर आपला अहवाल पक्षाकडे सादर केला होता. त्यानंतर मुंबईमध्ये भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत नांदेड महानगर आणि ग्रामीणच्या दोन जिल्हाध्यक्षपदासाठी काही नावे ठरविण्यात आली. त्यावर मुख्यमंत्री निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्हाध्यक्षांची नियुक्ती १० मेपूर्वीच होणार होती; परंतु गेल्या आठवड्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे भाजपातील ही प्रक्रिया खोळंबली होती. पक्षाच्या प्रदेश निवडणूक अधिकाऱ्यांनी गुरुवारी दुपारी राज्याच्या वेगवेगळ्या भागांतील ५८ जिल्हाध्यक्षांची यादी मुंबईहून जारी केली. त्यात केवळ नांदेड महानगराध्यक्षांचेच नाव आहे. दक्षिण आणि उत्तर जिल्हाध्यक्षपदासाठी पक्षामध्ये मोठी चुरस आणि रस्सीखेच असल्यामुळे या दोन जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या नंतर होतील, असे सांगण्यात आले.