तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने मी पहिल्यांदा बंडखोरी केली. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि मी स्वत: मिळून १५० बैठका घेतल्या, आणि आमदारांचं मन वळवलं. जनतेच्या कौलाकडे पाठ वळवणाऱ्या लोकांना इशारा देण्यासाठी ‘मातोश्री’वर जाऊन हात दाखवणारा मी पहिला होतो, असं विधान आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केलं आहे.

धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आले असताना एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना तानाजी सावंत हा दावा केला आहे. सावंतांच्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यावर आता शिवसेना ( ठाकरे गट ) नेते, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

हेही वाचा : “तिने काय-काय लफडी केली…” सुषमा अंधारेबाबत केलेल्या विधानावर शिरसाटांचं स्पष्टीकरण; म्हणाले…

“याचा अर्थ सुस्पष्ट आहे, हे लोक म्हणत होती, उद्धव ठाकरे आम्हाला भेटत नाहीत. निधी मिळत नाही. अजित पवार आणि राष्ट्रवादी त्रास देते. या सगळ्या पोकळ गप्पा हे लोक मारत होते. यांच्या मनातच दुहीचं आणि गद्दारीचं बीज आधीपासूनच पेरलेले होते. सावंतांच्या वक्तव्यावरून हे स्पष्ट होतं, यांना गद्दारी करायची होती,” अशी टीका अंबादास दानवे यांनी केली आहे.

तानाजी सावंत नेमकं काय म्हणाले?

“३० डिसेंबर २०१९ ला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. ३ जानेवारी २०२० च्या आसपास सुजितसिंह ठाकूर, मी स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने तमाम महाराष्ट्रात पहिल्यांदा बंडखोरी केली. धाराशिव जिल्हा परिषद शिवसेना-भाजपाची, जे साडेबारा कोटी जनतेने कौल दिला होता, ती सुरुवात या ठिकाणाहून केली, ही वस्तुस्थिती आहे. त्यावेळी बंडाचं निशाण फडकवणारा मी होतो,” असं तानाजी सावंतांनी म्हटलं.

हेही वाचा : ‘उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हजर व्हा…’; दिल्ली उच्च न्यायालयाचं समन्स, काय आहे प्रकरण?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मी तेवढ्यापुरता थांबलेलो नव्हतो. ज्यांना इशारा द्यायचा होता, महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा ‘मातोश्री’वर जाऊन हात करुन सांगितलं, की परत या ‘मातोश्री’ची पायरी चढणार नाही. आणि हे सरकार उलथवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही,” असं तानाजी सावंत म्हणाले.