Amit Thackeray on Shivsena UBT MNS Alliance : गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांवर शिवसेना (ठाकरे) व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची चर्चा रंगत आहे. शिवसेनेचे (ठाकरे) नेते देखील याबाबत दररोज वेगवेगळी वक्तव्ये करत आहेत. प्रामुख्याने खासदार संजय राऊत याबाबतीत आघाडीवर आहेत. मात्र, “प्रसारमाध्यमांवर बोलून युती होत नसते. त्यासाठी थेट संपर्क करावा लागतो, चर्चा करावी लागते”, असं म्हणत मनसे नेते अमित ठाकरे यांनी संजय राऊत व इतर शिवसेना (ठाकरे) नेत्यांना टोला लगावला आहे.

अमित ठाकरे म्हणाले, “युती होणे किंवा एकत्र येण्याबाबत दोन भावांनी (राज ठाकरे व उद्धव ठाकरे) बोललं पाहिजे. करोना काळात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना पहिला फोन केला होता. त्या काळात आमचा पक्ष त्यांच्या सरकारबरोबर होता. मी अनेकदा राज ठाकरे यांना पहिला फोन करताना पाहिलं आहे. मात्र यावेळी केवळ माध्यमांवर चर्चा घडवून आणल्या जात आहेत. माध्यमांसमोर बोलून, वर्तमानपत्रात लिहून युत्या होत नाहीत. दोन्ही भावांकडे एकमेकांचे फोन नंबर आहेत. ते दोघे एकमेकांशी बोलू शकतात”.

तुम्ही कोणाला फसवताय? अमित ठाकरेंचा राऊतांना प्रश्न

मनसे नेते म्हणाले, “मला नाईलाजने प्रसारमाध्यमांसमोर यावं लागलं आहे. मी इथे आलोय कारण काही लोक रोज सकाळी उठून काहीतरी बोलत आहेत. मुळात तुम्ही कोणाला फसवताय? ते दोन भाऊ त्यांची चर्चा करतील. दोघांपैकी कोणीही पुढाकार घ्यावा. मी पुढाकार घेऊ शकत नाही. मी त्यात काही बोलू शकत नाही. ते दोन भाऊ जोवर या विषयावर काही बोलत नाहीत, तोवर मी यावर काहीच बोलणार नाही”. दरम्यान, अमित ठाकरे यांना यावेळी विचारण्यात आलं की तुमची इच्छा काय आहे? यावर अमित ठाकरे म्हणाले, “जी राज ठाकरे यांची इच्छा असेल तीच माझी इच्छा आहे”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, “शिवसेनेचे (ठाकरे) नेते फक्त बोलत आहेत, त्यांच्याकडून कृती काहीच होत नाही. दुरून डोंगर साजरे असा हा सगळा प्रकार आहे”, असा चिमटा मनसेने काढला आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले, “मनसेच्या नेत्यांचं मला काही माहिती नाही. मला फक्त एकच गोष्ट माहिती आहे की राज ठाकरे यांनी एकत्र येण्याची भूमिका मांडली आणि उद्धव ठाकरे यांनी त्या भूमिकेला प्रतिसाद दिला आहे. भविष्यात हे दोन नेते रितसर माहिती देतील”.