संगमनेर: मुळा नदीवर मोरवाडी धरणासंदर्भात पुढील आठवड्यात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे मंत्रालयात बैठक होणार असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी पठारभागातील वरवंडी येथे एका कार्यक्रमात बोलताना दिली. त्यामुळे साकूर पठार भागातील जनतेच्या आशा आता पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत.
साकूर पठार भागाचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटावा यासाठी मुळा नदीवर मोरवाडी धरण व्हावे अशी या भागातील जनतेची अनेक वर्षांची मागणी आहे. मोरवाडी येथे धरण झाले तर याचा फायदा संपूर्ण पठार भागासह संगमनेर व पारनेर या दोन्ही तालुक्यांना होऊ शकतो. तसेच या भागातील कायमचा पाणी प्रश्न सुटू शकतो. यामुळेच आमदार खताळ यांनी दिलेल्या माहितीमुळे पठार भागातील जनतेच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत.
याबाबतचा पूर्वेतिहास असा की, १९५६ साली मोरवाडी येथे धरणासाठी जागा संपादित करण्यात आली होती. मात्र नंतर हे ठिकाण मागे पडून याच नदीवर पुढे राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे २६ टीएमसी क्षमतेचे मुळा धरण बांधण्यात आले. सध्या मुळा नदीवर मागे आंबीत व पिंपळगाव खांड ही दोन धरणे आहेत. यापैकी पिंपळगाव खांड धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये साकूर पठार भागातील गावांचा समावेश नसल्याने पाण्यापासून ही गावे वंचित आहेत. या धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये पठार भागाचा समावेश करण्यासाठी अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळे पठार भागासाठी मोरवाडी हे स्वतंत्र धरण व्हावे अशी या भागातील नागरिकांची इच्छा आहे. विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान आमदार अमोल खताळ व माजी खासदार सुजय विखे, मंत्री राधाकृष्ण विखे यांनी आपण साकूर पठार भागाचा पाणीप्रश्न सोडविणार असा शब्द दिला होता. त्या दृष्टीने होणारी ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.