रविवारी ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आलं. या पुरस्कार सोहळ्यासाठी राज्यभरातून आप्पासाहेबांचे अनुयायी आले होते. मात्र, या कार्यक्रमानंतर उष्माघातानं तब्बल ११ जणांचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळातही उमटताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे.
अमोल मिटकरी यांनी ट्वीट करत ११ जणांच्या मृत्यूला राज्य सरकराला जबाबदार धरलं आहे. ते म्हणाले, “आजवर महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची सुद्धा एक पद्धत होती. मात्र या सरकारने अध्यात्माचे राजकारण करत नाहक लोकांचा बळी घेतला आहे. त्यांच्या मृत्यूला शिंदे सरकार जबाबदार आहे”. तसेच त्यांनी शिंदे सरकारविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही केली. “११ जणांच्या मृत्यू प्रकरणी शिंदे सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. ही मागणी आता सद्गुरू परिवारानेही जोर लाऊन धरली पाहिजे”, असे ते म्हणाले.
हेही वाचा – महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला उपस्थित ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून कुटुंबियांना मदतीची घोषणा
दरम्यान, या घटनेवरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही शिंदे सरकारवर हल्लाबोल केला. अजित पवार यांनी काल रात्री उशीरा रुग्णालयात जाऊन रुग्णांची भेटली. यावेळी बोलताना ते म्हणाले, “महाराष्ट्रभूषण पुरस्कार फार महत्त्वाचा आहे. पण हलगर्जीपणा झाल्यामुळे काय घडू शकतं, हे आजच्या घटनेतून पाहायला मिळालं. महत्त्वाच्या कार्यक्रमाला गालबोट लागलं. अजूनही नेमके किती लोक मृत्यूमुखी पडले हा आकडा समोर येत नाहीये. खरंतर कार्यक्रमाची वेळ उन्हाळ्यात भर दुपारची निवडणं हेच आयोजकांचं चुकलेलं आहे. आपल्यातले निष्पाप लोक मृत्यूमुखी पडले आहेत”
