मागील अनेक दिवसांपासून माजी मंत्री तथा आमदार अनिल पबर यांच्यामागे दापोली येथील रिसॉर्टच्या जमीन खरेदी व बांधकामाप्रकरणी चौकशीचा ससेमिरा लागलेला आहे. हे रिसॉर्ट बेकायदेशीर असून ते बांधण्यासाठी एवढा पैसा कोठून आला? असा सवाल भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केलेला आहे. दरम्यान, यावर अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या रसॉर्टशी माझा काहीही संबंध नाही. मी या प्रकरणावर का बोलू? मी किरीट सोमय्या यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा केलेला आहे. त्यांना माझी माफी मागावी लागेल अन्यथा कारवाईला सामोरे लागेल, असे परब म्हणाले आहेत. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

हेही वाचा >>> “आनंद दिघेंनी गद्दारी झाल्यानंतर ठाण्यात…,” अरविंद सावंत यांनी शिंदे गटाला करुन दिली आठवण

दापोली येथील रिसॉर्टच्या बाबतीत मी वेळोवेळी सांगितलेले आहे, की या रिसॉर्टशी माझा काहीही संबंध नाही. या प्रकरणाची ईडी, स्थानिक प्राधिकरणाने चौकशी केलेली आहे. स्थानिक प्राधिकारण तसेच कोर्ट जो निर्णय देईल, त्याला आम्ही बंधनकारक आहोत. किरीट सोमय्या यांना आम्ही बंधनकारक नाही आहोत. सोमय्या यांच्या हातात उद्या हातोडा दिला, तर ते रिसॉर्ट पाडू शकतील का? हे रिसॉर्ट पाडायचे असेल तर संबंधित यंत्रणांनी तसा आदेश देणे गरजेचे आहे. या यंत्रणा जो आदेश देतील त्या आदेशाचे आम्ही पालन करू, असे अनिल परब म्हणाले.

हेही वाचा >>> दसरा मेळाव्यासाठी शेवटचा पर्याय काय? शिवसेना रस्त्यावरची लढाई लढणार? अनिल परबांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…

या रिसॉर्टशी माझा संबंध नसेल तर मी यावर का बोलू? ज्यांचा संबंध आहे ते यावर बोलतील. ज्यांचा या प्रकरणाशी संबंध आहे, ते माझे मित्र आहेत. हे मी आआधी वारंवार कबूल केले आहे. सदानंद कदम यांनी रिसॉर्टचा मालक असल्याचे स्वीकारलेले आहे. सात बाऱ्यावर त्यांचे नाव आहे. त्या रिसॉर्टसाठीचा खर्चही त्यांनी वेगवेगळ्या संस्थांना दिला आहे. तरीदेखील फक्त माझी, उद्धव ठाकरे तसेच सरकारची बदनामी करायची म्हणून सोमय्या वारंवार आरोप करत आहेत. त्यांच्यावर मी अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. अब्रुनुकसानीच्या खटल्यात जे पुरावे द्यायचे आहेत, ते मी देईन. तेव्हा त्यांना माफी मागावी लागेल किंवा कारवाईला सामोरे लागेल, असे परब किरीट सोमय्या यांना उद्देशून म्हणाले.