पंढरपूर : ज्ञान ही सर्वांत मोठी संपत्ती आहे. आज विद्यार्थ्यांनी पदवी व पदविकेच्या माध्यमातून मिळवलेल्या ज्ञानाचा, शिक्षणाचा उपयोग हा राष्ट्राच्या वैभवासाठी करावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.

सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा २१ वा दीक्षांत समारंभ विद्यापीठाच्या दीक्षांत मैदानात पार पडला. यावेळी मुख्य अतिथी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील बोलत होते. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर तर गोवा उच्च शिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. गोपाल मुगेराया यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा सादर केला.

प्रारंभी दीक्षांत मिरवणूक निघाली. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे हे ज्ञानदंड हाती घेऊन मिरवणुकीच्या अग्रभागी होते. यामध्ये विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषद, विद्यापरिषद, अधिसभेचे सदस्य तसेच पदवी घेणारे स्नातक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी एकूण १० हजार ९५५ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. याचबरोबर ८९ संशोधक विद्यार्थ्यांना पीएच. डी पदवी तर ५९ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके देऊन सन्मानित करण्यात आले.

पुढे बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, मिळवलेल्या पदवीचा केवळ नोकरीसाठी उपयोग न करता त्याचा समाज व देशाच्या वैभवासाठी होणे महत्त्वाचे आहे. राज्यात महाविद्यालयीन शिक्षकांची भरती ही लवकरच सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले. डॉ. मुगेराया म्हणाले की, शिक्षणाच्या जोरावरच आपण प्रगती साधू शकतो. विद्यार्थ्यांनी कौशल्य व व्यावसायिक शिक्षण घेऊन नोकरी मागणारे न होता नोकरी देणारे बनावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कुलगुरू डॉ. महानवर म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आज पारंपरिक शिक्षण देण्याबरोबरच कौशल्य व व्यावसायाभिमुख शिक्षण देऊन रोजगारक्षम पिढी निर्माण करीत आहे. याचबरोबर विद्यापीठाने पाच लाख वृक्ष लागवडीचा संकल्प करून आतापर्यंत सव्वा लाख वृक्ष लावले आहेत. समाज आणि शिक्षण क्षेत्राचे नाते दृढ करण्यासाठी काही गावे दत्तक घेऊन तेथेही काम विद्यापीठाने सुरू केले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमास आमदार श्रीकांत भारतीय, भाजप शहर अध्यक्ष प्रा. रोहिणी तडवळकर, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजाभाऊ सरवदे, प्रा. देवानंद चिलवंत, माजी कुलगुरू डॉ. इरेश स्वामी, माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे, दयानंद संस्थेचे सचिव महेश चोप्रा, डॉ. बी. पी. रोंगे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. यशपाल खेडकर व डॉ. तेजस्विनी कांबळे यांनी केले.