राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी काल (दि. ३ फेब्रुवारी) अहमदनगरमधील ओबीसी एल्गार मेळाव्यात भाषण करत असताना कोल्हापूरमधील नाभिक समाजाच्या एका तरूणाबरोबर झालेल्या घटनेचा उल्लेख करून नाभिक समाजाला मराठा समाजावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले. या आवाहननंतर आमदार बच्चू कडू यांनी जोरदार टीका केली. "मी सगळ्या समाजाला विनंती करतो की, मी किंवा इतर कुणीही नेते काय बोलतात, याकडे लक्ष देऊ नका. प्रत्यक्षात काय घडतं आणि आपण कसे चांगले राहू शकतो, याकडे लक्ष दिले पाहिजे", अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारावरही बच्चू कडू यांनी विधान केलं. “मिरवणुकीत पिस्तुल काढणारा, गोळीबार करणारा…”, आदित्य ठाकरेंनी वाचली शिंदे गटाच्या आमदारांच्या गुन्ह्यांची यादी आमदार बच्चू कडू म्हणाले, "आता निवडणुकाचा हंगाम आहे. निवडणूक काळात याआधी आपण देशात धर्म आणि जाती-पातीमधील लढाई पाहिलेली आहे. यातून हक्कांची लढाई मागे पडते. त्यामुळे समाजाने राजकीय नेत्यांवर कितपत विश्वास ठेवावा, हे निश्चित केले पाहीजे. जेणेकरून एका ताटात जेवणाऱ्या समाजबांधवांचे ताटच हिसकावले तर जाणार नाही ना, याकडेही बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. जाती-पातीच्या विषयासंदर्भात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाल्यानंतर बोलू, असे मी जाहीर केलेले आहे. या वादाच्या भोवऱ्यात मला पडायचे नाही. महाराष्ट्र एकत्र राहिला पाहीजे, या भूमिकेतून काय बोलायचे, काय नाही बोलायचे हे मी ठरविलेले आहे. १९ फेब्रुवारीनंतर मी बोलेन." १९ फेब्रुवारीनंतच का बोलणार? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता बच्चू कडू म्हणाले, "१९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी १८ पगड जातींना एकत्र करून स्वराज्य निर्माण केले. त्यामुळे १८ पगड जाती एकत्र राहिल्या पाहीजेत. हिंदुस्तान अभेद्य राहिला पाहीजे आणि शेतकरी जगला पाहीजे, ही भूमिका आम्ही मांडू." “आमची शेवटची निवडणूक आहे समजून…”, अजित पवारांकडून बारामतीकरांना विनंती बंदूक काढावी पण… भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्यानंतर त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटले. या विषयाबद्दल पत्रकारांनी विचारले असता बच्चू कडू म्हणाले, "बंदूक काढायला काही हरकत नाही, पण ती स्वहितासाठी किंवा स्वसरंक्षणार्थ नाही, तर देशाच्या रक्षणासाठी काढायला हवी. एखादी गोळी स्वतःला मारून घेण्यालाही काही हरकत नाही, पण ते देशहितासाठी, शेतकरी आणि मजूरांसाठी करायला हवे. तर आम्ही त्याचे स्वागत केले असते. सध्या शेतकऱ्यांचे प्रश्न ज्वलंत बनले आहेत. कांदा, कापूस, सोयाबिन यांदे दर कोसळले आहेत. शेतकरी धास्तावले असून मला रोज अनेक शेतकऱ्यांचे फोन येतात. त्यामुळे इतर राजकारणापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला पाहीजे, असे बच्चू कडू म्हणाले. आगामी निवडणुकीच्या संदर्भात बोलताना बच्चू कडू म्हणाले, भाजपाला जितकी लोकसभा महत्त्वाची आहे. तितकीच आम्हाला विधानसभा महत्त्वाची आहे. त्यामुळे लोकसभेच्या माध्यमातून विधानसभेच्या वाटाघाटी झाल्या तरच आम्ही भाजपाबरोबर राहू. नाहीतर आम्ही लोकसभेच्या दोन-तीन जागा लढू, असा सूचक इशारा बच्चू कडू यांनी केला. आमची लोकसभा लढायची इच्छा नाही. पण या निवडणुकांच्या निमित्ताने विधानसभेची आताच चर्चा करावी, अशी मागणी त्यांनी केली.