काँग्रेस नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या कारभारावर टोला लगावला आहे. “दीड महिना मंत्रीमंडळच नसणं ही इतिहासातील महत्त्वाची घोष्ट घडलीय. त्यांनी इतिहास घडवला आहे,” असं खोचक वक्तव्य थोरातांनी केलं. ते बुधवारी (१० ऑगस्ट) स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त धुळे तालुक्यातील कापडणे येथे आझादी गौरव पदयात्रेच्या उद्घाटनासाठी आले असताना माध्यमांशी बोलत होते.

बाळासाहेब थोरात म्हणाले, “दीड महिन्यानंतर का होईना आम्हाला मंत्री मिळाले याचा मला आनंद झाला. या मंत्रिमंडळात एकही महिला नाही. आम्ही सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला आणि काम करण्याची संधी दिली. त्यांच्याकडून एका महिलेला संधी देण्यात आली नाही.”

“त्यांनी इतिहास घडवला आहे”

“उलट ज्या नेत्यांवर अत्याचाराचे आरोप आहेत ते आता मंत्रिमंडळात सन्मानाने आले आहेत. आरोप असणारे मंत्री आहेत ही माझ्यामते खूप काळजीची गोष्ट आहे. असं असलं तरी आम्ही म्हणतोय की चला एकदाचे मंत्री तरी मिळाले. दीड महिना मंत्रीमंडळच नसणं ही इतिहासातील महत्त्वाची घोष्ट घडलीय. त्यांनी इतिहास घडवला आहे,” असं म्हणत बाळासाहेब थोरातांनी खोचक टोला लगावला.

सरकार अडीच वर्षे चालेल का?

पत्रकारांनी हे सरकार उर्वरित उडीच वर्षे चालेल का? असा सवाल केला. यावर थोरात म्हणाले, “या सरकारमधील लोकांमध्ये आजही मतभेद आहेत. खातेवाटप अद्याप जाहीर झालेलं नाही. दीड महिना मंत्री नाहीत. मंत्रीमंडळ विस्तार होऊन २४ तास झाले तरी खातेवाटप नाही. याचा अर्थ ओळखून घ्यायचा की किती पराकोटीचे मतभेद असतील. मला वाटतं त्यांनी मतभेद मिटवावेत आणि लवकर खातेवाटप करून कामाला लागावं.”

हेही वाचा :

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“गोरगरिबांच्या भाकरीवर आणि दुधावरही जीएसटी लावला”

“या पदयात्रेत धुळे तालुक्यातील ग्रामस्थ आणि काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. देशात सध्या सर्वत्र महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गोरगरिबांच्या भाकरीवर आणि दुधावरही जीएसटी लावला आहे. इंग्रजांनी मीठावर कर लावला होता. आता भाजपा सरकारने पिठावर कर लावला आहे. यामध्ये गरिबांचं जगणं हराम करण्याचं काम सध्या देशात सुरू आहे. म्हणून हुकूमशाही व बेरोजगारी विरोधात उभं राहण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे,” असंही थोरातांनी म्हटलं.