मुंबई महापालिकेच्या सुमारे ८० सेवासुविधा व्हॉट्सअॅपवर एका संदेशाद्वारे मिळू शकणार आहेत. पालिकेने याकरिता व्हॉट्सअॅप कंपनीच्या सहकार्याने नवीन सुविधा विकसित केली आहे. लोकाभिमुख अशा ‘व्हॉट्सअॅप चॅट बॉट’ या सुविधेचे काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन करताना विरोधी पक्ष भाजपावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधल्याचे दिसून आले. “काम न करताही बोलणारे लोक आहेत. पण आमचा कारभार उघड आहे, काही लपवत नाही, महापालिका नेमकी काय आहे, कसं काम करते हे समोर आलं पाहिजे. शेवटी आपलं काम बोलतं. शंका घेणारे अनेक आहेत, पण प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही.”, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सुनावले होते. यावर आता भाजपाकडून प्रत्युत्तर दिलं गेलं आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्याच्या या विधानवरून ट्वीटद्वारे प्रश्नांची सरबत्ती करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबई महापालिकेच्या कारभारावर टीका केली आहे. कामासाठी तिळगुळाची अपेक्षा नको ! ; मुख्यमंत्र्यांच्या कर्मचाऱ्यांना कानपिचक्या, भाजपलाही सुनावले “गारगाई धरणाच्या खर्चाच्या कितीतरी पट जास्त खर्च करुन समुद्राचे पाणी गोडे करण्याचा हट्टाहास का?, गेल्या २४ वर्षात २१ हजार कोटी खर्च करुनही मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे का?, ११४ टक्के नालेसफाई करुनही मुंबईत पाणी का तुंबते?, मुंबई पालिका वर्षाला साडेचार हजार कोटी आणि पाच वर्षात २२ हजार ५०० कोटी खर्च करुन ही पालिकेच्या रुग्णालयात उंदराने डोळे कुरतडून रुग्ण मरतोच कसा?, वरळीच्या सिलेंडर स्फोटातील रुग्णांचा मृत्यू का झाले?, मृतदेहा शेजारीच कोरोना रुग्णांना उपचार का दिले?, परिक्षा रद्द करणारेच विद्यापीठात पदवीदान समारंभाला पाहुणे कसे?, ज्यांनी प्रकल्पांना विरोध केला तेच आज प्रकल्पांचे श्रेय घ्यायला आणि नावं द्यायला पुढे पुढे कसे?,मुंबईत गेल्या ११ वर्षात ४० हजार झाडांची बिल्डरांसाठी कत्तल केली, मग मुंबईकरांची मेट्रो कारशेडच का अडवून ठेवली?” अशा प्रकारे आशिष शेलार यांनी प्रश्नांची सरबत्ती केली आहे. तसेच, “कोस्टलरोडच्या कामात १६०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा तवंग कसा?, मुंबईतील आरक्षणे बदलून भूखंडांचे श्रीखंड कुणी खाल्ले?, मुंबईतील गिरणी कामगार कुठे गेले?, असे बरेच प्रश्न मुंबईकरांना रोज पडतात, आम्ही ते विचारत राहू! कारण…प्रश्न विचारायला फार अक्कल लागत नाही?” असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानावर प्रत्युत्तरंही दिलं आहे.