“महाराष्ट्रातील १४ कोटी नागरिकांचं गोपनीय मत घेतलं तर महानालायकाच्या पहिल्या नंबरवर उद्धव ठाकरे दिसतील. ज्या उद्धव ठाकरेंनी पालघरचं साधुसंतांच हत्याकांड बघितलं, तेव्हा ते मूग गिळून गप्प राहिले. ज्यांनी कोविड काळात १०० कोटीचा भ्रष्टाचार केला, त्यांनी १४ कोटी जनतेला वाऱ्यावर सोडलं. अडीच वर्ष पेन न वापरणारा आणि दोन दिवस मंत्रालयात येणारा मुख्यमंत्री आम्ही पाहिला. ते उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना नालायक म्हणत आहेत. महाराष्ट्रातील जनता त्यांना माफ करणार नाही”, अशा शब्दात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावती येथे शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले. अनिल देसाई यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख करत टीका केली होती.
उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देत असताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही ठाकरेंवर एकेरीत टीका केली. “उद्धव ठाकरे पिसाळलेले आहेत, त्यांना ठाऊक आहे की, मागच्या वेळेस मोदीजींचा फोटो लावून १८ खासदार निवडून आले. आता मोदींचा फोटो गेला आणि मोदींचं नावही गेलं, त्यामुळे त्यांची १८ खासदारांची संख्या आता दोन-चार वर येईल. त्यामुळेच उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झाले आहेत. नैराश्यामुळे त्यांच्या मनावर परिणाम झाला असून त्यातूनच ते असे बोलत आहेत. त्यांना महाराष्ट्रातल्या उत्कृष्ट अशा मनोरुग्णालयामध्ये दाखल करण्याची गरज आहे”, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
‘हो, मी आदित्यला…’, उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ दाव्यावर फडणवीस स्पष्टच म्हणाले, “मला वेड…”
दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्स वरही पोस्ट टाकून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. या पोस्टमध्ये ते लिहितात, “देवेंद्रजींच्या पाठीत खंजीर खुपसून स्वतः मुख्यमंत्रिपदावर बसायचं, मुलाला मंत्रिपद द्यायचं आणि बाळासाहेबांच्या निष्ठावंत शिवसैनिकाला वाऱ्यावर सोडायचं याला कोडगेपणा म्हणतात. लोकसभा निवडणुकीत जनाधार मिळत नसल्यानं उद्धव ठाकरेंनी आता लाज सोडली आणि वाट्टेल ते बडबडत आहेत. तुम्ही कितीही शिव्याशाप द्या, देवेंद्रजींसारख्या सच्चा नेत्याला त्यानं फरक पडणार नाही पण येत्या निवडणुकीनंतर जनता तुम्हाला मात्र कायमचं घरी बसवेल हे नक्की.”
उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?
दक्षिण मध्य मुंबईत महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर एकेरी टीका केली होती. उद्धव ठाकरे म्हणाले की, २०१४ ची लोकसभा निवडणूक होईपर्यंत आदित्यने निवडणूक लढवण्याचा विचार केला नव्हता. त्यानंतर त्याने विधानसभा निवडणूक लढवण्याचा विचार केला. त्यावेळी फडणवीसांनी कोपराला गुळ लावण्याचा प्रयत्न केला. ते मला म्हणाले, “उद्धवजी मी काय करतो, मी आदित्यला चांगला तयार करतो. आपण अडीच वर्षांनी त्याला मुख्यमंत्री करू”. मी त्यांना म्हटले, आदित्य अजून लहान आहे, त्याच्या डोक्यात काहीतरी घालू नका. त्याला आधी आमदार म्हणून त्याची कारकीर्द सुरू करू द्या. तुम्ही त्याला नक्कीच तयार करा. मात्र मुख्यमंत्रीपद वगैरे त्याच्या डोक्यात घालू नका.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “देवेंद्रने आम्हाला शब्द दिला. अहो, देवेंद्र जनाची नाही, मनाची तरी ठेवा. त्या दोन्ही तुम्हाला नाहीत, हे आम्हाला माहीत आहे. लाजलज्जा सोडलेला कोडगा माणूस आहे हा. जिला तुम्ही कुठली तरी खोली म्हणताय, ती खोली आमच्यासाठी मंदिर आहे. तुम्ही कुठल्या खोल्यांमध्ये काय करता ते आम्ही बघू इछित नाही.”