राज्यात महाविकासआघाडीचं सरकार आल्यानंतर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून सातत्याने सरकार पडण्याची चर्चा केली जात आहे. भाजपाच्या काही नेत्यांनी सरकार कधी आणि कसं पडेल, याविषयी देखील केलेली विधानं बरीच चर्चेत राहिली. आता पुन्हा एकदा राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधानसभा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईत बोलताना सूचक विधान केलं आहे. अण्णासाहेब पाटील यांच्या ८८व्या जयंतीनिमित्त माथाडी कामगारांचा मेळावा नवी मुंबईत आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात फडणवीसांनी हे विधान केलं आहे.

“लोकशाहीत कमी-अधिक होत असतं”

माथाडी कामगार चळवळीसाठी आमच्या सरकारने सर्व दरवाजे पूर्णपणे उघडे केले होते, असं फडणवीस यावेळी म्हणाले. “माथाडींच्या चळवळीसाठी आमच्या काळात सरकारचे दरवाजे आम्ही पूर्णपणे उघडे केले होते. माथाडी नेत्यांनी कधीही प्रश्न मांडले की आम्ही ते सोडवायचो, अशी व्यवस्था आम्ही उभी केली होती. पुढचा काळ मिळाला असता, तर उरलेले प्रश्नही सोडवले असते”, असं ते म्हणाले.

“या सरकारला आता माथाडींचे प्रश्न सोडवण्याची संधी आहे, तेही सोडवतील असा मला विश्वास आहे. नाही सोडवले, तर आम्हाला पुन्हा संधी मिळणार आहे. तेव्हा आम्ही ते प्रश्न सोडवू. तीही अडचण नाही. लोकशाहीमध्ये कमी-अधिक होत असतं. कधी हे असतात, कधी ते असतात. पण कामगारांचे प्रश्न पक्षाच्या पलीकडे जाऊन पाहायला हवेत”, असं फडणवीस यांनी यावेळी नमूद केलं.

“..सावध राहा बाबा, उद्या इन्कम टॅक्स घरी नाही आलं म्हणजे झालं”, ओबीसी परिषदेत छगन भुजबळांची टोलेबाजी!

“मी नरेंद्रजींना म्हणालो, आपल्यावर नक्की गुन्हा दाखल होईल”

दरम्यान, यावेळी करोनाचे सर्व नियम पाळून आपण हा कार्यक्रम करत आहोत, असं नमूद करताना नरेंद्र पाटील यांच्यासोबत झालेल्या चर्चेचा दाखला देवेंद्र फडणवीस यांनी दिला. “आज करोनाचे नियम पाळून हा कार्यक्रम आपण घेतला. नरेंद्र पाटील म्हणाले होते की की केंद्रीय श्रममंत्री या कार्यक्रमात यायला हवेत. मी त्यांना म्हटलं की आपल्या कार्यक्रमात संख्या इतकी असते, की कोविडचे नियम मोडल्याबद्दल आपल्यावर नक्की गुन्हा दाखल होईल. पण नरेंद्रजींनी याच वर्षी केंद्रीय श्रममंत्र्यांना बोलवायला सांगितलं. ते म्हणाले, काही काळजी करू नका. नियमानुसार दोन्ही डोस घेतलेले लोक सभागृहात उपस्थित राहतील आणि इतर सगळे जण ऑनाईन माध्यमातून कार्यक्रम पाहतील. मी भूपेंद्र यादव यांचे आभार मानतो की त्यांनी फक्त एका फोनवर कार्यक्रमाला येण्यासाठी होकार दिला”, असं फडणवीस म्हणाले.