गुहागर तालुक्यातील ३५ लाखाच्या विकास कामाला प्रशासकीय मान्यता मिळालेली असताना स्थगिती देण्यात आल्याने माजी आ. डॉ. विनय नातू चांगलेच भडकले आहेत. याविषयी त्यांनी आरोप करत आपण मत्स्य व्यवसाय मंत्री नीतेश राणे यांच्याकडे तक्रार करुन हा विकासाचा अनुशेष भरुन काढणार असल्याचे डॉ. नातू यांनी सांगितले.
ते म्हणाले, ठराविक तालुक्यांमध्येच मत्स्य व्यवसाय विकासाची अधिक कामांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र आपण मत्स्य व्यवसाय मंत्र्यांकडे हा विषय मांडून येथील मत्स्य विकासाचा अनुशेष कसा भरुन काढता येईल, याकडे लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी सांगितले. मासेमारी बंदराच्या विकासासाठी सर्वेक्षण,सुधारणा व मच्छिमार बंदराचा विकास करणे या योजनेअंतर्गत जिल्हा वार्षिक योजना २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये कोणती कामे मंजूर झाली? व ३१ मार्च २०२५ अखेर किती निधी खर्च झाला? याविषयी रत्नागिरी पतन अभियंत्यांकडून डॉ. विनय नातू यांनी मत्स्य विभागाचा आढावा घेतला असता ठराविक तालुक्यांमध्येच या कामाच्या निधीची तरतूद करण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात जास्त मच्छिमार आहेत. त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यात ३० हजार, दापोली तालुक्यात १४ हजार, गुहागर तालुक्यात १४ हजार तर राजापूर तालुक्यात १० हजार याप्रमाणे मच्छिमारांची लोकसंख्या आहे. जिल्ह्यात सर्वात जास्त मासळी उतरविण्याची ठिकाणे रत्नागिरी तालुक्यात २० आहेत. गुहागरमध्ये १२, दापोलीत ६ आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात ही ठिकाणे असताना या सर्वांच्या विकासाचा केंद्रबिंदू सर्व तालुके असणे गरजेचे असल्याचे डॉ. नातू यांनी सांगितले.
मात्र असे असताना रत्नागिरी तालुक्यात पावणे चार कोटीची कामे, राजापूर तालुक्यात सव्वा कोटी, दापोलीमध्ये २ कोटी तर गुहागरमध्ये १ कोटी कामे आहेत. यामध्ये गुहागरमधील एका ३५ लाखाच्या कामाला मंजूरी असताना प्रशासकीय कामाला स्थगिती देवून हे काम थांबविले असल्याचा आरोप डॉ. नातू यांनी केला आहे.