महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील आरक्षण मिळेपर्यंत बेमुदत उपोषणावर ठाम असताना दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी समितीला मुदतवाढ देत तातडीने आरक्षण मिळण्याची शक्यता धूसर असल्याचेच सूतोवाच दिले. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून शिंदे सरकारवर हल्लाबोल केला जात असताना भाजपाकडूनही त्याला प्रत्युत्तर दिलं जात आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपावर केलेल्या टीकेला पक्षाकडून उलट जाब विचारत प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

नेमकं काय घडलं?

मराठा आरक्षणाचं आंदोलन राज्यात पेटलेलं असताना देवेंद्र फडणवीस मात्र छत्तीसगडमध्ये पक्षासाठी प्रचार करत असल्याची टीका ठाकरे गटासह महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण करत असूनही अद्याप त्यावर तोडगा निघालेला नाही. त्यात पाच राज्यांच्या निवडणुकांच्या वेळापत्रकाची घोषणा झाल्यामुळे या राज्यांमध्ये प्रचाराचा धुरळा उडाल्याचं चित्र आहे. देवेंद्र फडणवीसही भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रचारसभा घेत असताना त्यावरच विरोधी पक्षांकडून आक्षेप घेण्यात आला.

“मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री त्यांच्यातल्या नाराजीनाट्यासाठी, मंत्रीमंडळ विस्तारासाठी दिल्लीत जातात, आरक्षणाच्या मुद्द्यासाठी एकदा तरी ते दिल्लीत गेलेत का आत्तापर्यंत? का नाही गेले? सगळे समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून अस्वस्थ आहेत. त्यांची रिकामी पोटं भरण्याची जबाबदारी कुणाची आहे?” अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

उद्धव ठाकरेंना भाजपाचा सवाल

दरम्यान, विरोधकांकडून टीका केली जात असताना भाजपानं उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेचा समाचार घेताना भाजपानं उद्धव ठाकरेंनाच उलट प्रश्न केला आहे. “बाप रुग्णालयात असताना पोरगा लंडनमध्ये काय करत होता ते उद्धव यांनी आधी सांगावं. मग देवेंद्रजींना विचारावं की बाहेर प्रचारासाठी का गेलात”, असं भाजपा महाराष्ट्रच्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“उद्धवजी, आणखी सांगू का?”

“मुंबई बुडत असताना बाळासाहेबांना होडीत सोडून स्वत: फाईव्हस्टारमध्ये ते काय करत होते, ते उद्धव यांनी आधी सांगावं. मगच देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारण्याचं धाडस करावं. उद्धव ठाकरेजी, आणखी सांगू का? म्हणजे यादी वाढवता येईल”, असा टोलाही भाजपानं उद्धव ठाकरेंना लगावला आहे.