मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. जालन्यातील अंतरवाली सरोटी येथे आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी लाठीहल्ला केल्यानंतर राज्यभर याचे पडसाद उमटले. दरम्यान, विरोधी पक्षातील नेत्यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तुलना जनरल डायर आणि उप जनरल डायर अशी केली. शिवाय ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनीही सरकारवर टीकास्र सोडलं

या घडामोडींनंतर आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांच्या टीकेला भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राज्यात अडीच वर्षे तुमचं सरकार होतं, या काळात तुम्ही काय दिवे लावले? असा टोला गोपीचंद पडळकरांनी लगावला. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

हेही वाचा- “…तर ते उपोषण सोडायला तयार”, मनोज जरांगेंच्या पत्नीची प्रतिक्रिया, म्हणाल्या, “बारा वाजेपर्यंत…”

गोपीचंद पडळकर यावेळी म्हणाले, “संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी या राज्यातील जनतेच्या हितासाठी घेतलेला एक निर्णय सांगावा. त्यांनी याबाबत किमान एक कागद तरी दाखवावा. हे पूर्ण वेळ मोकळी माणसं आहेत, ते काहीही बोलतात. पण जेव्हा निर्णय घ्यायची वेळ येते, तेव्हा ते काहीच करत नाहीत. आमचे नेते हे निर्णय घेणारे नेते आहेत. ते केवळ निर्णय घेऊन थांबत नाहीत, तर त्याची अंमलबजावणी करण्याची प्रचंड क्षमता आणि ताकद त्यांच्यामध्ये आहे.”

हेही वाचा- “…ही सर्व नौटंकी आहे”, मनोज जरांगे यांच्याशी सुरू असलेल्या राजकीय भेटीवर प्रकाश आंबेडकरांचं विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“त्यामुळे संजय राऊत किंवा आदित्य ठाकरे काय बोलले? याने आम्हाला काही फरक पडत नाही. राज्यात अडीच वर्षे तुमचं सरकार होतं. या काळात तुम्ही काय दिवे लावले? राज्यात कोविडसारखी साथ आली. देशात सगळ्यात जास्त लोक महाराष्ट्रात मेली. अनेकांना व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड किंवा डॉक्टर मिळाले नाहीत. ही माणुसकी नसणारे लोक आहेत. आता त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही. सत्ता गेली आहे. सगळा पक्ष फुटला आहे. त्यामुळे हे लोक काहीही बोलतात. पण आमचं नेतृत्व खूप चांगल्याप्रकारे काम करत आहेत”, असंही गोपीचंद पडळकर म्हणाले.