मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून ठाम भूमिका घेतलेली असताना आज दिवसभर मनसेच्या कार्यकर्त्यांकडून अजानसमोर हनुमान चालीसा वाजवली जाणार आहे. एकीकडे या मुद्द्यावरून राजकारण तापलेलं असताना भाजपा आमदार नितेश राणे यांनी केलेल्या ट्वीटमुळे चर्चा सुरू झाली आहे. नितेश राणे यांनी आज सकाळी तीन ट्वीट केले असून त्यामधून भोंग्यांच्या मुद्द्यासोबतच राज्य सरकारवर देखील निशाणा साधताना रझा अकादमी आणि पीएफआयसारख्या संघटनांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

“लाऊडस्पीकर ही खरी समस्या नाहीच”

नितेश राणेंनी केलेल्या ट्वीटमध्ये रझा अकादमी आणि पीएफआयला लक्ष्य करण्यात आलं आहे. “लाऊडस्पीकर्स ही खरी समस्या नाहीच. खरी समस्या ही समाजात विष कालवणाऱ्या रझा अकादमी आणि पीएफआयसारख्या दहशतवादी संघटना आहेत. त्यांच्याविरोधात एकत्रपणे लढा देणं हीच काळाची गरज आहे. या संघटनांवर बंदी घालण्यासाठी प्रत्येकानं एकत्र येऊन पुढाकार घेणं गरजेचं आहे. त्यानंतरच शांतता प्रस्थापित होईल”, असं आपल्या ट्वीटमध्ये नितेश राणे म्हणाले आहेत.

“ज्या दिवशी माझं सरकार महाराष्ट्रात येईल त्यावेळी रस्त्यावरील नमाज…”; राज ठाकरेंनी शेअर केला बाळासाहेबांचा जुना Video

“..तरीही राज्य सरकार त्यांना आंदोलनाची परवानगी देते!”

दरम्यान, या संघटनांवरून नितेश राणेंनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “रझा अकादमी ही एक दहशतवादी संघटना असून तिची कोणत्याही धर्मादाय आयुक्तालयाकडे नोंद झालेली नाही. अर्थात त्यांच्याकडे कोणताही नोंदणी क्रमांक नाही. तरी देखील राज्य सरकार त्यांना आंदोलन करण्याची आणि काम करण्याची परवानगी देते. त्यांना कुठून निधी मिळतो हे आपल्याला कसं कळणार? त्यांचं सर्व कामकाज ताबडतोब बंद व्हायला हवं”, अशी मागणी नितेश राणे यांनी ट्वीटमधून केली आहे.

“त्यांना संपवण्याची हीच योग्य वेळ आहे”

“एक सच्चा मुस्लीम कधीही त्याच्या देशाविरुद्ध किंवा राज्याविरुद्ध जाणार नाही. ते हिंदू किंवा इतर कुणाहीइतकंच त्यांच्या मायभूमीवर प्रेम करतात. पण रझा अकादमी आणि पीएफआयसारख्या संघटनाच द्वेष आणि भेदभाव पसरवततात. अमरावती, नांदेडमधील दंगली हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. त्यांना संपवण्याची वेळ आली आहे”, असं नितेश राणेंनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, अजानसमोर हनुमान चालीसा वाजवण्याच्या मनसेच्या भूमिकेनंतर आज ठिकठिकाणी हनुमान चालीसा वाजवली जात असल्याचं दिसून येत आहे.