माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूर येथील भाषणात देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाची एक क्लिप ऐकवली आणि त्यांचा उल्लेख नागपूरचा कलंक असा केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरेंची जुनी क्लिप ट्वीट केली आणि आठ मुद्द्यांमध्ये त्यांना उत्तर दिलं आहे. मात्र हा वाद काही शमताना दिसत नाहीये कारण भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी अख्खी एक कविता सादर करत कलंक कसा ओळखावा? हे वर्णन केलं आहे. उद्धव ठाकरेंना उद्देशूनच ही कविता त्यांनी पोस्ट केली आहे.

काय आहे केशव उपाध्ये यांनी पोस्ट केलेली कविता?

पडवळ बाहूचे पसरुनी पंख
दूध पाजणारासि घेतो डंख॥
उच्च कोटीचा मानसिक रंक
तो येक वोळखावा कलंक॥

कुटुंबाची करितो धन
साधा देह सडके मन॥
कर्तृत्व जया अंगी निरंक
तो येक वोळखावा कलंक॥

पूर्वायुष्यी बहु केला राडा
घरी बैसोनि हाकला गाडा॥
सत्ता गमावुनि झाला खंक
तो येक वोळखावा कलंक॥

कलंकाचे कैसे बोलणे
कलंकाचे कैसे चालणे॥
दिसणे हसणे जयाचे
कलंकचि असे॥

शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा नागपुरात कार्यकर्त्या मेळावा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला होता. देवेंद्र फडणवीस नागपूरला लागलेला कलंक आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. याला देवेंद्र फडणवीस ‘कलंकीचा काविळ’ म्हणत प्रत्युत्तर दिलं आहे. तर भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी कविताच ट्वीट करत उत्तर दिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

“देवेंद्र फडणवीस हे नागपूरला लागलेला कलंक आहे. आता सांगत आहेत, उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला, म्हणून आम्ही यांच्याबरोबर गेलो. पहिलं उद्धव ठाकरेच्या पाठीत खंजीर कुणी खुपसला? २०१४ ते २०१९ तुमच्याबरोबर सत्तेत होतो. २०१४ साली शिवसेनेनं नाहीतर, तुम्ही युती तोडली. तेव्हा मी काँग्रेसबरोबर गेलो नव्हतो. मी तिथेच होतो आणि तिथेच आहे. वार करणारी तुमची अवलाद आहे,” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.