भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच धुळे दौऱ्यावर आले असता, त्यांनी पक्षाची संघटनात्मक बैठक या कार्यक्रमांतर्गत कार्यकर्त्यांशी भाषणातून संवाद साधला. यावेळी बावनकुळे यांनी धुळे जिल्ह्यात ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा एकही कार्यकर्ता उमेदवारीसाठी शिल्लक ठेवू नका, असेच थेट आवाहन उपस्थित भाजपा कार्यकर्त्यांना केले.

याचबरोबर आगामी काळात भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा प्रवेश करून घ्या. लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या कामाला लागा. असे देखील त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांना आवाहन केले.

राष्ट्रवादी, काँग्रेस व आता शिवसेना नाही तर उद्धव गट, असे म्हणत हे तीनही पक्ष एकत्र आले तरी, यंदा महाराष्ट्रातून लोकसभा निवडणुकीत ४५ पेक्षा अधिक जागा आपण मोदीजींच्या नेतृत्वाखाली निवडून देऊ असे आवाहन देखील यावेळी बावनकुळे यांनी केले आहे.

शरद पवार सोडल्यास राष्ट्रवादी…; भाजपा, PM मोदींवर केलेल्या टीकेवरुन बावनकुळेंचा राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल

याशिवाय, चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे. रविवारी तालकटोरा स्टेडियमवर झालेल्या राष्ट्रवादीच्या आठव्या राष्ट्रीय अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर करण्यात आलेल्या टीकेवरुन बावनकुळे यांनी राष्ट्रवादी पक्षाचा उल्लेख ‘टोळी’ असा केला आहे. मात्र त्याचवेळी बावनकुळे यांनी शरद पवार यांनी महाराष्ट्रासाठी केलेल्या कामाचाही उल्लेख केला आहे.