ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील पोलीस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे. १० डिसेंबर रोजी राऊतांनी दै. सामना वृत्तपत्रातून रोखठोक सदरात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. यावरून यवतमाळ जिल्ह्याचे समन्वयक नितीन भुतडा यांनी तक्रार केली. त्यांच्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. देशद्रोहाचा गुन्हा दाखल होताच संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहा यांना आणीबाणीचा काळ आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावरून लक्ष्य केलं.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आमच्या मनात आदराची भावना आहे. त्यांच्यावरील टीका ही राजकीय स्वरुपाची असते, व्यक्तिगत स्वरुपाची नसते”, असं स्पष्टीकरण संजय राऊतांनी दिलं. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.

हेही वाचा >> “…तर मोदींनी पाकिस्तानशी संगनमत करून बॉम्ब टाकला असता”, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

पुढे ते म्हणाले, दोन दिवसांपूर्वी अमित शाहांनी ३७० कलमासंदर्भात पंडित नेहरुंवर टीका केली होती. म्हणून कोणी अमित शाहांवर गुन्हा दाखल करणार आहे का? या देशात लोकशाही आहे, या देशात संविधान आहे. या देशात अद्याप हुकूमशाही किंवा आणीबाणी लावलेली नाही. किंवा आमच्या जीभा कापून टाकलेल्या नाहीत, असाही पलटवार त्यांनी केला.

“टीका टीप्पणी होतच असतात. तुम्ही आमच्यावर करता, आम्ही तुमच्यावर करतो. ते पंतप्रधान आहेत, कोणी मंत्री आहेत, कोणी मुख्यमंत्री आहेत. पण राजकीय भूमिका घेतल्यावर त्यावर एखाद्या पक्षाने गुन्हा दाखल करून अटकाव करत असतील तर यांना आम्ही आणीबाणीविरोधात लढा दिला असा डंका पिटण्याची गरज नाही. कारण, आणीबाणीविरोधात लढा या सेन्सॉरशिपविरुद्ध होता, हे या लोकांनी समजून घेतलं पाहिजे. या देशातील पंतप्रधान ही महान संस्था आहे, ती व्यक्ती नाही. आमची टीका ही राजकीय असते, एखाद्या भूमिकेविरोधात असते. या देशाच्या विरोधात कोणी काम करत असताना दिसत असेल तर त्याविरुद्ध आमची टीका असते. हे कोणाला मान्य नसेल तर या देशाचं संविधान त्यांनी वाचायला हवं”, असंही संजय राऊत म्हणाले.

संजय राऊतांनी रोखठोकमध्ये काय लिहिलं होतं?

पाच राज्यातील विधानसभा निवडणूक निकालावर भाष्य करताना संजय राऊत आपल्या लेखात म्हणाले की, ‘इंडिया’ आघाडीस मरगळ झटकून पुढचे दमदार पाऊल टाकायला लावणारे हे निकाल आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान काँग्रेसने जिंकले असते तर २०२४ च्या निवडणुकीआधी मोदी यांनी पाकिस्तानशी संगनमत करून एखादा बॉम्ब टाकला असता. एखादे नवे ‘पुलवामा’ घडताना उघड्या डोळ्याने पाहिले असते. काश्मीरातील हिंसाचारात पाकिस्तानचा हात आहे, ‘देश खतरे में है’च्या गर्जना करून ‘देशभक्ती’साठी भाजपाने मते मागितली असती. जवानांच्या शवपेट्यांना वंदन करण्याची छायाचित्रे फिरवून आपल्यासारखे आपणच, दुसरे कोणी नाही हे ठसवण्याचा प्रयत्न झाला असता, अशी टीका संजय राऊतांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तक्रारीत काय म्हटलं?

संजय राऊत यांनी आपल्या लेखात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह व प्रक्षोभक असे विधान केल्यामुळे देशाची जागतिक पातळीवर बदनामी झाली. भारत हा धर्मविरोधी देश आहे, असे या लेखातून राऊत यांनी भासविले. राऊत यांचे लिखाण गंभीर स्वरुपाचे असून त्यांनी देशात दोन धर्मांत जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे संजय राऊत यांना अटक करून देशद्रोही प्रक्षोभक वक्तव्य केल्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार नितीन भुतडा यांनी उमरखेड पोलिसांत दिली.