राज्यातील सर्व सरकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी फोनवरून संवाद साधताना हॅलो ऐवजी ‘वंदे मातरम्’ म्हणायचं, असा आदेश सांस्कृतिक कार्यमंत्री मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे. या आदेशाला अनेक राजकीय नेत्यांनी याला विरोध केला आहे. या आदेशावर राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी टीका केली आहे. “जय महाराष्ट्र म्हणायचं की वंदे मातरम् याबाबत मुख्यमंत्र्यांनी मुनगंटीवारांना विचारलं पाहिजे”, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे.

हेही वाचा- ‘वंदे मातरम्’वरुन नव्या वादाला सुरुवात; मुनगंटीवारांच्या आदेशास रझा अकादमीचा विरोध

शिवसेना नेते ‘जय महाराष्ट्र’ म्हणतात

मंत्री झाल्यावर आदेश काढला, या निर्णयात वाईट वाटण्यासारखं काही नाही. काही जण ‘जय हिंद’ बोलतात, काही ‘जय महाराष्ट्र’ बोलतात, आमचे पोलीस बांधव फोन केल्यावर जय हिंद म्हणतात. शिवसेनेचे लोक जय महाराष्ट्र म्हणतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला तर ते जय महाराष्ट्र म्हणतात. आता शिंदेंनी मुनगंटीवारांना विचारावं, की फोन केल्यावर काय म्हणायचं? आपण जे आदेश काढतो त्याचं भान ठेवायला हवं. असं कुणावर बंधन घालणं योग्य नाही. लोकांच्या आवडी निवडीनुसार ते बोलतात, असं भुजबळ म्हणाले.

हेही वाचा- शासकीय कार्यालयांमध्ये ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम्’ म्हणायचं का? अब्दुल सत्तारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

आदेशाला वाढता विरोधा पाहता मुनगंटीवारांचे स्पष्टीकरण

फोनवर हॅलो ऐवजी जय महाराष्ट्र म्हणण्याच्या आदेशाला मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसत आहे. वाढत्या विरोधानंतर मुनगंटीवारांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. हॅलोऐवजी केवळ ‘वंदे मातरम्’ हाच शब्द वापरा, असं म्हटलं नसल्याचे मुनगंटीवार म्हणाले. इंग्रजांनी किंवा विदेशातून आलेल्या ‘हॅलो’ शब्दाऐवजी ‘वंदे मातरम्’ शब्द वापरावा, हे अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आमच्या विभागाचं सुरू केलेलं अभियान आहे. एखादा व्यक्ती ‘वंदे मातरम्’च्या तोडीचा शब्द वापरत असेल किंवा राष्ट्रभक्ती, देशभक्ती व्यक्त करणारा शब्द वापरत असेल, तर त्याला आमचा विरोध असण्याचं काहीच कारण नाही.” असं मुनगंटीवार म्हणाले.