Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (अजित पवार) आज २६ वा वर्धापन दिन पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या पक्षाचे अनेक नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी राजकारणासह विविध विषयांवर भाष्य केलं. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्षाबरोबर म्हणजे महायुतीबरोबर जाण्याचा निर्णय कधी व का घेतला? याबाबत देखील अजित पवार यांनी भाष्य केलं. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला मंत्री छगन भुजबळ हे अनुपस्थित असल्याचं पाहायला मिळालं.

मंत्री छगन भुजबळ हे अनुपस्थित असल्याने ते पुन्हा नाराज आहेत का? असा सवाल राजकीय वर्तुळातून उपस्थित करण्यात आला. काही दिवसांपूर्वीच छगन भुजबळ यांची मंत्रि‍पदी वर्णी लागली. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार सत्तेत आल्यानंतर छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं होतं. त्यामुळे भुजबळांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. एवढंच नाही तर त्यांनी अजित पवार यांच्यावरही टीका केली होती. मात्र, त्यानंतर नुकतंच काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. मंत्रि‍पदी वर्णी लागल्यानंतरही छगन भुजबळ हे पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात दिसले नाहीत.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात छगन भुजबळ उपस्थित नसल्यामुळे पुन्हा वेगवेगळ्या चर्चा रंगू शकतात. याचा अंदाज घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छगन भुजबळ हे कार्यक्रमाला का उपस्थित राहिले नाहीत? याचं कारण भर कार्यक्रमात बोलताना सांगितलं. या कार्यक्रमाला छगन भुजबळ हेच नाही तर आणखी जे नेते उपस्थित नव्हते, त्यांच्याबाबतही अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं. दत्‍तात्रय भरणे, दिलीप वळसे पाटील आणि छगन भुजबळ हे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला का उपस्थित राहू शकले नाहीत? याबाबत अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं.

अजित पवार काय म्हणाले?

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (अजित पवार) आज २६ वा वर्धापन दिन पुण्यात होत असला तरी राज्याच्या इतरही काही भागात आपला वर्धापन दिनाचा कार्यक्रम साजरा होत आहे. त्यामुळे मला समाधान आहे. मात्र, आजच्या या कार्यक्रमाला आपले काही कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत. छगन भुजबळ यांचा आधीच विदेश दौरा ठरलेला होता. दत्‍तात्रय भरणे यांचाही ३० दिवसांपूर्वी विदेश दौरा ठरलेला होता. दिलीप वळसे पाटील यांची तब्येत बरी नाही. त्यामुळे ते काल देखील एका कार्यक्रमाला आले नव्हते. त्यामुळे आजच्या आपल्या पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला हे तीनही प्रमुख नेते उपस्थित राहू शकले नाहीत”, असं अजित पवार यांनी सांगितलं आहे.

भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय का घेतला? अजित पवारांनी सांगितलं कारण

“मला आजही १० जून १९९९ हा दिवस आठवतो. शरद पवार आणि इतर काही मान्यवरांनी एकत्र येत राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली. तेव्हापासून आजपर्यंत पक्षाने कधीही मागे वळून पाहिलं नाही. आपल्या पक्षाला कधीही बहुमत मिळालं नाही. आपल्याला नेहमीच सत्तेत सहभागी व्हावं लागलं. कारण आधीपासूनच राजकारणाची अशी परिस्थिती निर्माण झाली की एका पक्षाची सत्ता येण्याचे दिवस संपले आहेत. कारण केंद्रात देखील कुणाला यूपीए किंवा कोणाला एनडीए अशी आघाडी आणि युती करावी लागल्याची परिस्थिती देशाने पाहिली आहे. पण सर्वांनी साथ दिल्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष २६ वा वर्धापन दिन साजरा करत आहे”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराने चालणारा पक्ष आहे. आता काही जण मला विचारतात की तुम्ही भाजपाबरोबर का गेला आहात? मी तुम्हाला सांगतो की, २०१९ साली आपल्या पक्षाने शिवसेना पक्षाबरोबर सरकार स्थापन केलं होतं. तेव्हा देखील आपण सत्तेसाठी काही तडजोडी केल्या होत्या. कारण शेवटी विरोधी पक्षात बसून आणि घोषणा देऊन चालत नाही. आपण साधू संत नाहीत. आपण लोकांचे प्रश्न सोडवणारे आणि बेरजेचं राजकारण करणारे लोक आहोत. त्यामधून आपण भाजपा आणि एनडीएबरोबर जाण्याचा निर्णय घेतला”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.