मुंबई : सरकारच्या योजना म्हणजे जोराचा वारा; पण तो गावापर्यंत नेणारा पंप म्हणजे सरपंच. पंप काम करेल तेव्हाच गावाच्या विकासाच्या ट्यूबमध्ये हवा भरेल आणि परिवर्तन घडेल, हे लक्षात घेऊन सरंपचांनी शेतकरी, महिला, बालक, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि महिला बचत गटांसाठी केंद्र-राज्य सरकारने दिलेल्या निधीचा सर्वोत्तम उपयोग करावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे केले. राज्याच्या सौर पंप योजनेची लवकरच गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

देशभरातील सरपंचाशी थेट संवाद साधण्यासाठी भारतीय गुणवत्ता परिषदेने ( क्युसीआय) तयार केलेल्या सरपंच संवाद या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातील सुमारे २५ हजार सरपंचांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संवादातून ग्राम विकासात आलेली प्रगल्भता लक्षात येते. अशा सशक्त संवादातून निश्चितपणे आपण समृद्ध राज्य आणि समृद्ध देश तयार करू,असे प्रतिपादन फडणवीस यांनी केले.
यावेळी राज्यमंत्री योगेश कदम, मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी, भारतीय गुणवत्ता परिषदेच्या नियामक मंडळाचे सदस्य हिमांशु पटे, ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले उपस्थित होते.

ग्राम विकासाशिवाय राज्याचा व देशाचा विकास होऊ शकत नाही. केंद्र सरकारने गेल्या दहा वर्षांत ग्रामविकासाला प्राधान्य देत मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला. महात्मा गांधी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांच्या ग्रामसमृद्धीच्या संकल्पनेतील समृद्ध आदर्श गाव निर्माण करण्यासाठी गावाच्या विकासकामांमध्ये लोकसहभाग आणि नेतृत्व या दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरणा-या असल्याचे फडणीस यांनी सांगितले.

गावांच्या सर्वांगीण विकासासाठी सरपंच हे परिवर्तनकर्ते आहेत. त्यामुळे सरपंचांची थेट निवडणूक ही परिवर्तनाची मोठी पायरी ठरल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, विविध योजना,अभियानातून गावांमध्ये मूलभूत काम उभे करता येते. जलयुक्त शिवार अभियानातून गावात नेतृत्व, सामूहिक शक्ती यातून किती मोठ्या प्रमाणात परिवर्तन करता येते याची प्रचिती लोकांना आली. या अभियानाने शेतीतील प्रगतीची नवी दिशा दिली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये सगळ्या गावांनी अतिशय उत्तम काम केलं आहे. राज्यातील प्रत्येक गाव स्मार्ट ग्राम बनवण्याचा संकल्प व्यक्त करत मुख्यमंत्री म्हणाले की, फायबर नेटवर्कनंतर आता स्टार्लिंक सहकार्याने सर्वोत्कृष्ट इंटरनेट कनेक्टिव्हिटी गावापर्यंत दिली जाईल. स्मार्ट उपकरणांमुळे उत्पादकता वाढून शेतकऱ्यांचा खर्च कमी होईल, असे त्यांनी सांगितले.

सौर पंप योजनेची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

मुख्यमंत्री सौर पंप योजना महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर यशस्वी होत असून, जागतिक गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड महाराष्ट्राच्या नावावर होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. दिवसा पंप आणि रात्री घराला मोफत वीज अशा खर्च बचतीच्या संकल्पना आता वास्तवात येत आहेत. शासन नैसर्गिक शेतीची संकल्पना मिशन म्हणून राबवणार असून उत्पादन खर्च कमी करत शेतीला शाश्वत करण्यावर भर देत असल्याचे फडणीस यांनी सांगितले.