मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरचा गुरूवारी लातूरमध्ये अपघात झाला. मात्र, या अपघातामधून ते थोडक्यात बचावले आहेत. लातूर दौऱ्यावर असलेले देवेंद्र फडणवीस गुरुवारी निलंग्याहून मुंबईच्या दिशेने येण्यासाठी निघाले होते. हेलिपॅडची व्यवस्था नसल्यामुळे याठिकाणी असलेल्या एका शाळेच्या मैदानातून हेलिकॉप्टरने आकाशात उड्डाण केले. यावेळी हा अपघात झाला. हेलिकॉप्टर जमिनीवरुन काही उंचीवर असतानाच अचानक खाली कोसळले. सुदैवाने हेलिकॉप्टर खाली असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर येऊन आदळले. उड्डाण केल्यानंतर लाईटच्या तारेला हेलिकॉप्टरचा काही भाग लागल्यामुळे हा अपघात झाला. अपघातापासून १०० मीटर अंतरावर विजेचा ट्रान्सफॉर्मर आहे. हेलिकॉप्टर या ट्रान्सफॉर्मरला धडकले असते तर मोठा अपघात होऊ शकला असता. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावले, असे सांगितले जात आहे.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर हेलिकॉप्टरमध्ये त्यांचे सचिव प्रवीण परदेशी, स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार आणि केतन पाटील हे तिघेहीजण प्रवास करत होते. मात्र, हे सर्वजण सुखरुप आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:हून ट्विट करुन आपण सुखरुप असल्याची माहिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या उजव्या हाताला किरकोळ खरचटले आहे. मात्र, डॉक्टरांनी माझी वैद्यकीय तपासणी केली असून माझा रक्तदाब आणि इतर गोष्टी व्यवस्थित आहेत. त्यामुळे काळजी करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
गडचिरोलीत रात्री उडणारे हेलिकॉप्टर हवे
[jwplayer kgyBcVrO]
Chopper with Maharashtra CM Devendra Fadnavis onboard crash-lands in Latur, CM and team escapes unhurt pic.twitter.com/1tQ4NXqeoo
— ANI (@ANI_news) May 25, 2017
Our helicopter did meet with an accident in Latur but me and my team is absolutely safe and ok.
Nothing to worry.— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 25, 2017
With the blessings of people of Maharashtra and Nation, I'm safe.
My team is fine too.
Please do not believe any rumours. pic.twitter.com/4B7OUmD0ss— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 25, 2017
भाजपच्या शिवार यात्रेला लातूर जिल्ह्यातील निलंग्यातून गुरुवारपासून सुरूवात झाली. त्यासाठी मुख्यमंत्री लातूरला गेले होते. येथील कार्यक्रम आटोपल्यानंतर मुख्यमंत्री मुंबईकडे येण्यासाठी निघाले होते. यावेळी त्यांचे हेलिकॉप्टर टेकऑफ केल्यानंतर लगेच जमिनीवर कोसळले. दुर्घटनेच्या वेळी हेलिकॉप्टर जास्त उंचीवर नसल्याने अनर्थ टळला. हा अपघात नेमका कशामुळे झाला हे अद्याप कळू शकलेले नाही. मात्र, अपघातग्रस्त हेलिकॉप्टर २२ वर्षे जुने असल्याची माहिती आता समोर येत आहे. यापूर्वीही या हेलिकॉप्टरच्या इंजिनमध्ये बिघाड झाला होता.
राज्य सरकार ताशी पावणेदोन लाख रूपये भाड्याची विमानं, हेलिकॉप्टर्स घेणार
काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने शासकीय कामांसाठी विमाने आणि हेलिकॉप्टर भाड्याने घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी खासगी कंपन्यांची नेमणूक केली जाणार आहे. यासंबंधी सामान्य प्रशासन विभागाने जीआर काढला होता. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना शासकीय कामासाठी तातडीने प्रवास करायचा असेल सरकारी विमानांची कमतरता आहे. तसेच लहान विमाने भाड्याने घेण्याची गरजही सरकारने व्यक्त केली होती. या भाड्याने घेण्यात येणाऱ्या विमानाचे भाडेही प्रचंड आहे. ६ ते १५ जण बसू शकणाऱ्या या विमानाचे आणि हेलिकॉप्टरचे ताशी भाडे ९९,९९९ ते १,७८,५०० रूपये असते. सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या या जीआरमुळे हवाई वाहतूक संचालनालयाला दोन खासगी कंपन्यांसोबत वाटाघाटी करायची परवानगी मिळणार आहे. या वाटाघाटीअंतर्गत या दोन खासगी कंपन्यांशी केलेला करार दोन वर्षांसाठी म्हणजेच २०१८ अखेरीपर्यंत असणार आहे. या जीआरमध्ये म्हटल्याप्रमाणे सरकारने २२ लहान विमानांची निवड केली आहे. या विमानांची प्रवासी संख्या ६ ते १५ एवढी आहे. या २ विमानांमध्ये एका एअर अॅंब्युलन्सचाही समावेश आहे. या दोन खासगी कंपन्या या स्वरूपाची विमाने भाड्याने पुरवणार आहेत.