रत्नागिरी : कोकणात होत असलेल्या तेल शुद्धीकरण प्रकल्पाबाबत दुटप्पी भूमिका न घेता सहकार्य करा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाच्या विरोधकांना केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शिंदे शुक्रवारी प्रथमच रत्नागिरी दौऱ्यावर आले. या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत राजापूर तालुक्यातील प्रस्तावित तेल शुद्धीकरण प्रकल्पाबाबत छेडले असता ते म्हणाले की, आम्ही बहुसंख्य लोकांबरोबर आहोत आणि रत्नागिरी जिल्ह्यातील बहुसंख्य लोकांना हा प्रकल्प हवा आहे. त्यामुळे विरोध असलेले ठिकाण बदलून प्रकल्प उभारणीचे नियोजन चालू आहे. प्रकल्पाबाबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. आधीच्या सरकारने प्रकल्प होण्यासाठी सकारात्मक पावले उचलली होती. परंतु आधी हो म्हणायचे आणि नंतर आपल्याच लोकांना सांगून विरोध करायचा, अशी त्यांची पद्धत होती. समृद्धी महामार्गाबाबतही असेच आव्हान होते. त्या वेळीही राजकारण केले जात होते; परंतु ते लोकांनीच हाणून पाडले. तीच परिस्थिती येथे पाहायला मिळेल. हा प्रकल्प जनतेच्या हिताचा असून त्यातून मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक येणार आहे. तसेच रोजगारनिर्मिती होणार आहे. त्यामुळे सर्वच लोकप्रतिनिधींनी सकारात्मक दृष्टीने पाहायला पाहिजे. काही लोकांनी केवळ राजकारणापायी दुटप्पी भूमिका घेतली आहे. तसे त्यांनी करू नये. 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde appealed opposition to cooperate for oil refining project in konkan zws
First published on: 17-12-2022 at 03:48 IST