काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी पक्ष सदस्यत्वाचा रविवारी ( १४ जानेवारी ) राजीनामा दिला होता. त्यानंतर आता दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून दोनदा निवडून गेलेल्या देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे. पक्षप्रवेश करण्याआधी सिद्धीविनायक मंदिरात जाऊन देवरांनी गणरायाचं दर्शन घेतलं होतं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी काँग्रेसचे माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे.

हेही वाचा : मिलिंद देवरा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश का केला? काय आहे राजकीय गणित?

पक्षप्रवेशानंतर संवाद साधताना मिलिंद देवरा म्हणाले, “मी खूप भावूक आहे. मी काँग्रेस पक्ष सोडेन असं कधी वाटलं नव्हतं. पण, काँग्रेस पक्षाशी ५५ वर्षे असलेले नाते मी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संपवत आहे. माझे राजकारण नेहमीच सकारात्मक राहिलं आहे. माझी विचारधारा मुंबई, महाराष्ट्र आणि देशातील नागरिकांची सेवा करणं आहे. मुख्यमंत्री शिंदे हे मेहनती आणि सर्वांसाठी उपलब्ध असतात. जनतेच्या वेदना मुख्यमंत्र्यांना माहिती असतात. म्हणून त्यांचे हात मला आणखी बळकट करायचे आहेत. शिवसेनेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचेही हात मला बळकट करायचे आहेत.”

“राजकारणात जनसेवा आणि लोकसेवा महत्वाची आहे”

“माझे वडील मुरली देवरा बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं मुंबईचे महापौर झाले. मुरली देवरा आणि एकनाथ शिंदे यांनी आपल्या कारकिर्दीला नगरसेवक म्हणून सुरूवात केली. मुरली देवरा केंद्रीय मंत्री झाले, तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले. पण, राजकारणात जनसेवा आणि लोकसेवा महत्वाची आहे,” असं मिलिंद देवरांनी म्हटलं.

हेही वाचा : ठाकरे गटासमोर जागा राखण्याचे कडवे आव्हान तर भाजपनेही कंबर कसली

“खासदार होऊन मी शिवसेनेसाठी चांगलं काम करू शकतो”

“एकनाथ शिंदेंना मुंबई आणि महाराष्ट्राच्या हितासाठी काम करू शकणारे चांगली लोक हवे आहेत. खासदार होऊन मी शिवसेनेसाठी चांगलं काम करू शकतो, असं मत मुख्यमंत्री आणि श्रीकांत यांचं आहे,” असंही देवरांनी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“…तर मला आणि एकनाथ शिंदेंना इथे एकत्र बसावं लागलं नसतं”

“१९६८ आणि २००४ ची काँग्रेस आणि आताची काँग्रेसमध्ये खूप फरक आहे. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक आणि गुणवत्तेच्या आधारावर राजकारण केलं असतं, तर मला आणि एकनाथ शिंदेंना इथे एकत्र बसावं लागलं नसतं,” असं म्हणत देवरांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.