राष्ट्रवादीचे नेते अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांनी बंडखोरी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे साधारण ३० ते ४० आमदार आहेत. दरम्यान, अजित पवार यांच्या या भूमिकावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपा ऑपरेशन लोटस राबवून सगळीकडे चिखल करत आहे, असे पटोले म्हणाले आहेत. ते 'टीव्ही ९ मराठी'शी बोलत होते. अगोदर ईडीची भीती दाखवायची आणि मग. भाजपा ऑपरेशन लोटसच्या नावाने चिखल करत आहेत. भाजपा घाणेरडे राजकारण करत आहे. सत्तेसाठी आम्ही काहीही करू शकतो, हे भाजपाचे धोरण महाराष्ट्रातील जनतेला समजत आहे. अगोदर ईडीची भीती दाखवायची आणि त्यालाच मंत्रिमंडळात घ्यायचं, हे चित्र महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले आहे. महाराष्ट्रातील जनता हे नाट्य मान्य करणार नाही. लोकांनी भाजपाच्या प्रवृत्तीला ओळखले आहे, असे नाना पटोले म्हणाले. त्यांच्या पक्षाबद्दल बोलण्याचे कारण नाही- नाना पटोले अजित पवार यांच्या नाराजीबद्दल आम्हाला कशाला समजेल. त्यांचा पक्ष वेगळा आहे. तो त्यांच्या पक्षातील अंतर्गत प्रश्न आहे. त्यांच्या पक्षाबद्दल आम्ही बोलण्याचे कारण नाही, असेही पटोले यांनी स्पष्ट केले. "मी आताच यावर काहीही बोलणार" आम्ही कोणत्याही दबावाला बळी पडून सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतलेला नाही, अशी भूमिका अजित पवार यांचे समर्थन करणारे नेते छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. अनेक नेत्यांवर करण्यात आलेले आरोप हे खोटे ठरत आहेत, असेही भुजबळ म्हणाले. यावरही नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. "मी आताच यावर काहीही बोलणार नाही. कारण आता या घडामोडी नुकत्याच घडल्या आहेत. त्यामुळे सध्याच्या प्रकरणावर आताच बोलणे चुकीचे ठरेल," असे नाना पटोले म्हणाले. शरद पवार आता थेट लोकांत जाणार अजित पवार यांच्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तसेच काही नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली. मी उद्यापासूनच जनतेत जाणार आहे. कराड येथे जाऊन दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करणार आहे. त्यानंतर मी महाराष्ट्रात दौरा करणार आहे. माझा जनतेवर विश्वास आहे, असे शरद पवार म्हणाले. अजित पवारांनी सांगितला राष्ट्रवादी पक्षावर दावा दरम्यान, अजित पवार यांनी आमच्याकडे आकडा आडे. आम्हाला बहुतांश आमदारांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आगामी काळात आम्ही आमच्या पक्षाच्या नावावर तसेच चिन्हावर निवडणूक लढवणार आहोत, असे अजित पवार यांनी सांगितले. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी पक्षाचे काय होणार? शरद पवार या परिस्थितीला कसे हाताळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.