कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीवरुन सध्या काँग्रेस आणि भाजपा आमने-सामने आहेत. काँग्रेसने जयश्री जाधव तर भाजपाने सत्यजीत कदम यांची उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान सत्यजित कदम यांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यावर टीका करताना बंटी पाटील माणसं खाणारा माणूस आहे अशी टीका केली होती. त्यांच्या टीकेला सतेज पाटील यांनी उत्तर दिलं आहे.

काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सतेज पाटील पत्रकारांशी बोलत होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या टीकेवर बोलताना ते म्हणाले की, “कोल्हापुरात २०१९ विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेना-भाजप यांची युती होती. पण कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेच्या विरोधात चंद्रकांत पाटील यांनी अपक्ष उमेदवार उभे करून शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला. पराभवाचे हे शल्य शिवसैनिक विसरणार नाहीत. ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेला माहित आहे”.

“भाजपाच्या पायाखालची वाळू घसरत चालली असल्याने ते खालच्या पातळीवरची टीका करत आहेत. निवडणूक का लढवली याची चूक त्यांना आता लक्षात येऊ लागली आहे. त्यातूनच वैयक्तिक टीकाटिपणी करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे,” असंही ते म्हणाले. “राज्यात शिवसेनेच्या सहकार्याने भाजपाचा विस्तार झाला. सत्ता आल्यावर भाजपाने शिवसेनेला वाईट वागणूक दिली. याचे साक्षीदार शिवसैनिक आहेत. ते भाजपाच्या खोट्या आरोपांना फसणार नाहीत,” असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला.

“बंटी पाटील माणसं खाणारा माणूस”, चंद्रकांत पाटलांचं खळबळजनक विधान

“५० वर्षातील काँग्रेसचे कार्य आणि भाजपाचे पाच वर्षांचे कार्य याबाबत चंद्रकांत पाटील यांच्याशी कुठेही चर्चा करण्याची तयारी आहे,” असं आव्हान यावेळी सतेज पाटील यांनी दिलं.

“कोल्हापूरची पोटनिवडणूक भाजपाने जयश्री जाधव यांना निवडून देऊन बिनविरोध करायला हवी होती. यातून भाजपाच्या संस्कारी राजकारणाचे दर्शन घडले असते. पण सूडबुद्धीचे राजकारण म्हणून पोटनिवडणूक लादली असली तरी जनता काँग्रेसच्या मागे आहे,” असं ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“सार्वत्रिक निवडणूक असल्याप्रमाणे भाजपा शक्तीप्रदर्शन करत उत्साहाने उमेदवारी अर्ज भरत आहे. आमदार चंद्रकांत जाधव यांचं अकाली निधन झालं असल्याचं भान त्यांनी पाळलेलं नाही. भाजपाची उमेदवारी आयात असल्याने कोल्हापुरातील भाजपा, संघाच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मान्य नाही,” असे त्यांनी नमूद केले.