फडणवीस यांचे सरकार सर्वच आघाडय़ांवर अपयशी ठरले असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी, तर हे घूमजाव सरकार ठरले असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत केला.
निवडणुकीपूर्वी व जाहीरनाम्यात दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. निवडणूक काळात अनेक घोषणा केल्या होत्या. पुढील काळात त्या पूर्ण केल्या नाहीत वा पावलेही उचलली नाहीत. उलट, विरुद्ध दिशेला ते गेले आहेत, असा आरोप ठाकरे यांनी केला. महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना युती सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढणाऱ्या ‘घोषणाबाज सरकारचे १०० दिवस’ या पुस्तिकेचे प्रकाशन याप्रसंगी करण्यात आले.
गरीब माणूस, शेतकरी वा कामगारांसाठी कुठलेही ठोस निर्णय नाहीत. ठरावीक मूठभर भांडवलदारांना मदत केली व त्यांच्यासाठीच योजना या सरकारने राबवल्या. शेतकऱ्यांना कुठलेही आर्थिक पॅकेज, कर्जमुक्ती नाही. विजेचे दर वाढले. स्वतंत्र विदर्भाबाबत हे सरकार मूग गिळून बसले आहे. ९ फेब्रुवारीला राज्यात जिल्हास्तरावर रास्ता रोको केला जाणार असून त्यानंतर प्रत्येक घरातून पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना पत्रे पाठविली जाणार आहेत. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. हे सरकार घूमजाव सरकार असल्याचा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. गेल्या सरकारने पाच हजार रुपये हमीभाव, तसेच ३४ ते ४२ टक्के वाढीव भाव कृषीमूल्य आयोगाला सुचविला. फडणवीस सरकारला अडीच हजार रुपयेही भाव देता आला नाही. कायदा व सुव्यवस्था ढासळली असून यंत्रणेवरही नियंत्रण नाही असा आरोपही केला.
दानवेच काँग्रेसमध्ये येणार होते – ठाकरे
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हेच काँग्रेसमध्ये येणार होते, असा गौप्य्1ास्फोट माणिकराव ठाकरे यांनी केला. केंद्र सरकारमध्ये मंत्रिपद मिळेल काय, याबाबत घालमेल सुरू असताना ते काँग्रेस प्रवेश करण्याच्या तयारीत होते, असे ठाकरे म्हणाले. दमणगंगेचे ८२ टीएमसी पाणी गुजरातेत वळविण्याचा सरकारचा डाव असून केंद्र शासनाशी केलेला करार जाहीर करावा, तसेच मुख्यमंत्री कुणाकडून काळा पैसा घेतात, हे रामदास कदम यांनी जाहीर करावे, अशी मागणी विखे पाटील यांनी केली.