रत्नागिरी : हिंमत असेल तर एकटय़ा नरेंद्र मोदींच्या नावाने निवडणूक लढवा, असे आव्हान देत शिवसेना फोडून राज्यातील मराठी माणसाच्या, हिंदूत्वाच्या एकजुटीवर घाव घालणाऱ्यांना निवडणुकीच्या मैदानात संपवा, असे आवाहन शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी खेड येथे केले. खेड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. त्यानिमित्त येथील गोळीबार मैदानावर आयोजित जाहीर सभेत ठाकरे बोलत होते. निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्ष नाव मिंधे गटाला दिले असले तरी मी आमच्या संघटनेला शिवसेनाच म्हणणार. कारण निवडणूक आयोगाचा फैसला मला मान्य नाही, असे सुरुवातीलाच जाहीर करून ठाकरे म्हणाले की, भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारी संघटना म्हणून शिवसेनेचा जन्म झाला. पण ज्यांनी बाळासाहेबांना बघितलेलेसुद्धा नाही, ते आज आम्हाला त्यांचे विचार शिकवत आहेत. ज्यांना या संघटनेने बळ दिले, मोठे केले तेच निर्दयीपणे, निर्घृणपणे वागत आहेत. आपल्या आईवर त्यांनी वार केला आहे. आपले रक्त पिऊन हे ढेकूण मोठे झाले आहेत. निवडणुकीत मतदानाच्या बोटाने त्यांना चिरडून टाका. आमच्यावर घराणेशाहीचा आरोप करताना तुमची वंशावळ कुठली, असा सवाल करून ठाकरे म्हणाले की, मराठी माणसाचा आवाज आणि भगवे तेज संपवून टाकण्याचे काम हे लोक करत आहेत. त्यांच्या दृष्टीने विरोधी पक्ष पापी, गुन्हेगार आणि भ्रष्टाचारी. पण यांपैकी सर्वात जास्त लोक तुमच्याकडेच आहेत. आज आमचे आमदार राजन साळवी, वैभव नाईक यांच्या मागे चौकशी लावून छळ चालू आहे. पण उद्या दिवस फिरले तर तुमच्या घरा-दाराची काय हालत होईल, याचाही विचार करा. दंगलीमध्ये मुंबई वाचवणारे तुम्हाला देशद्रोही वाटतात का? आम्हाला देशद्रोही म्हणाल तर जीभ हासडून टाकू. चोरटय़ांना आशीर्वाद देणार का? या लोकांकडे विचार नाही. यांनी वल्लभभाई पटेल चोरले. सुभाषबाबू चोरले. बाळासाहेब ठाकरेसुद्धा चोरले. कारण यांच्याकडे वैचारिक वांझोटेपण आहे. अशा चोरांना तुम्ही मत देणार का? त्यांना आशीर्वाद देणार का? या सत्तेच्या गुलामांना येणाऱ्या निवडणुकीत घरी पाठवावे लागेल. तसा निर्धार तुम्हाला करावा लागेल, अन्यथा २०२४ ची निवडणूक या देशातील शेवटची निवडणूक ठरेल आणि त्यानंतर हुकूमशाही राजवट सुरू होईल, असा इशाराही ठाकरे यांनी दिला.