राज्यात आज दिवसभरात ३ हजार ६३६ नवीन करोनाबाधित आढळले असून, ५ हजार ९८८ जण करोनामधून बरे झाले आहेत. याचबरोबर, ३७ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही. शिवाय, तिसऱ्या लाटेचा शक्यता देखील वर्तवली जात आहे. अजुनही दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत असून, करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. तर, दररोज आढळणारी करोनाबाधितांची संख्या ही करोनातून बरे होत असलेल्यांच्या तुलनेत कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहे.

दरम्यान, राज्यात आजपर्यंत एकूण ६३,००,७५५ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.०९ टक्के एवढे झाले आहे.

आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६४,८९,८०० झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १३७८११ करोनाबाधितांचा मृत्यू झालेला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,४९,९९,४७५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,८९,८०० (११.८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,०३,१६९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,९६३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ४७,६९५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.