माझे कुटुंब, माझी जबाबदारीसारख्या मोहिमेच्या माध्यमातून करोनाची लढाई अधिक आक्रमकपणे लढत असून आगामी काळात मृत्यूदर आणि पॉझिटिव्हिटी दर कमी झालेला दिसेल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. राज्यात सर्वत्र टेलीआयसीयू व्यवस्था उभारून ग्रामीण भागातील रुग्णांना वेळीच उपचार कसे मिळतील हे आम्ही पाहणार आहोत असेही त्यांनी सांगितले आहे. करोनानंतर देखील रुग्णांमध्ये वैद्यकीय उपचारांची गरज असून उपचार केंद्रे सुरु करणार आहोत अशी माहिती त्यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब , तामिळनाडू या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी देखील यावेळी बैठकीत सहभाग घेतला. नरेंद्र मोदींनी यावेळी महाराष्ट्रातील लोक धैर्याने सामना करतात असे सांगत राज्यातील २० जिल्ह्यात विशेष समर्पित पथके नियुक्त करून संसर्ग कमी केल्यास देशाच्या कोरोना आकडेवारीवर परिणाम होईल अशी सूचना केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, “पंतप्रधानांनी आपल्या स्तरावरून परत एकदा देशातील नागरिकाना संबोधन करून करोनाचा लढा आपल्याला पुढील काळात कसा लढायचा आहे याविषयी मार्गदर्शन करावे. येणाऱ्या काळात सणवार, उत्सव येत असून करोना वाढू नये म्हणून आपल्यासमोर आव्हान आहे”. मुख्यमंत्र्यांनी यावेळी राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या महत्वाच्या उपाययोजनांची माहिती दिली. दररोज दीड लाखपर्यंत चाचण्या वाढवत आहोत अशी माहिती दिली.

“राज्यात प्रायोगिक तत्वावर टेलीआयसीयू व्यवस्था सुरु केली असून येणाऱ्या काळात याची उपयुक्तता पाहता सर्व राज्यात ही यंत्रणा उभारून विशेषत: ग्रामीण व दुर्गम भागात शहरातील तज्ञ डॉक्टर्सचे उपचारांसाठी मार्गदर्शन घेण्याचे ठरवले आहे,” अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली. “राज्यात ठिकठिकाणी जम्बो सुविधा, चाचण्यांची व्यवस्था, प्रयोगशाळा उभारल्या आहेत, आम्ही न थकता लढतो आहोत आणि हरणार नाही,” असा विश्वास उद्धव ठाकरेंनी यावेळी व्यक्त केला. “लस उत्पादन लवकरात लवकर व्हावे म्हणून ट्रायलची प्रक्रिया लवकर व्हावी. तसेच या लसीच्या वितरणाचे योग्य नियोजन आवश्यक आहे,” असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी दिले चष्म्याच्या सवयीचे उदाहरण
मुख्यमंत्र्यांनी मास्कची सवय कशी अंगी बाणवावी याविषयी बोलताना चष्म्याच्या सवयीचे उदाहरण दिले. ते म्हणाले कि, “पूर्वी जेव्हा चष्मा वापरायला सुरुवात झाली त्यावेळी त्याचा लोकांना खूप त्रास झाला असणार. तो घालणे चेहरा आणि नाकासाठी अडचणीचे झाले असणार. पण नंतर तो इतका सवयीचा भाग झाला आहे की आज त्याचा त्रास होत नाही”. पंतप्रधानांना हे उदाहरण इतके आवडले कि त्यांनी बैठकीच्या समारोपाच्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या उदाहरणाचा उल्लेख केला व पुढील काळात मास्क ही आपली अपरिहार्यता आहे असे सांगितले.