जिल्हय़ात सुरू झालेल्या संततधार अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना हवालदिल केले आहे. अवर्षणापाठोपाठ गारपीट आणि आता अवकाळीच्या चक्रात शेतकरी अडकला आहे. शनिवारी सायंकाळपासून सुरू झालेला पाऊस दुसऱ्या दिवशीही थांबलेला नव्हता. शेतातील उभा गहू, द्राक्षे, डाळिंब, आंब्याचा मोहोर आदीचे नुकसान झाल्याचा अंदाज केला जात आहे. काही ठिकाणची पिके अक्षरश: लोळली आहेत. राहाता, संगमनेर, अकोले परिसरात एक इंचाहून अधिक वृष्टी झाली. नुकसानीची पाहणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी दिल्या आहेत.
जिल्हय़ात सर्वदूर पाऊस सुरू आहे. कालपेक्षा आज पावसाचा जोर अधिक होता. नगर शहरातील अनेक रस्ते जलमय झाले आहेत. महापालिकेने काही रस्त्यांची नुकतीच डागडुजी केली होती. ती उखडली गेली व रस्ते पुन्हा खड्डेमय झाले. शहरात अनेक ठिकाणी रिलायन्स कंपनीची खोदाई सुरू आहे, त्यामुळे रस्ते निसरडे झाले आहेत. आज सकाळी नोंद झालेल्या गेल्या २४ तासांतील पावसाची तालुकानिहाय नोंद अशी (आकडे मिमी.)- अकोले ४३, कोपरगाव २०, संगमनेर ३८, राहाता ३१, राहुरी २७, श्रीरामपूर २४, नेवासे १४, शेवगाव ७, पाथर्डी १०, पारनेर ८, नगर १२, कर्जत ४, श्रीगोंदे ७, जामखेड ३.५, एकूण १७.७५ मिमी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Damage of wheat grapes pomegranate mango blossom due to odd time rain
First published on: 02-03-2015 at 03:45 IST