सर्वाचे लक्ष वेधलेल्या उस्मानाबाद मतदारसंघात शिवसेनेच्या प्रा. रवींद्र गायकवाड यांनी गत वेळच्या पराभवाचा वचपा काढताना राष्ट्रवादीच्या सत्तेला सुरूंग लावला. एकतर्फीच झालेल्या लढतीत गायकवाड यांनी तब्बल २ लाख ३३ हजार ७६५ मतांची दणदणीत आघाडी घेत राष्ट्रवादीचे खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांना पराभूत केले.
उस्मानाबाद हा तसा सेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. पूर्वी आरक्षित असलेला हा मतदारसंघ २००९ मध्ये खुला झाल्यानंतर खासदार डॉ. पाटील यांनी प्रथमच निवडणूक लढवून राष्ट्रवादीचा झेंडा फडकावला होता. त्या वेळी प्रतिस्पर्धी प्रा. गायकवाड अवघ्या ६ हजार ७८७ मतांनी पराभूत झाले होते. देशभरात असलेला ‘नमो’चा गजर व सेनेच्या सर्वानीच एकदिलाने केलेल्या कामाची पावती प्रा. गायकवाड यांना मिळाली.
मतमोजणीत पहिल्या फेरीपासून गायकवाड यांनी शेवटच्या, २७ व्या फेरीपर्यंत आपली आघाडी कायम ठेवली. त्यांना ६ लाख ६ हजार ३५१, तर डॉ. पाटील यांना ३ लाख ७२ हजार ५८६ मते मिळाली. डॉ. पाटील यांनी आतापर्यंत सहा विधानसभा व एक लोकसभा निवडणूक लढवून मतदारसंघावर आपले निर्वविाद वर्चस्व प्रस्थापित केले. मात्र, कधीही पराभव न पाहिलेल्या दिग्गजाला पराभूत करून नवा इतिहास रचला गेला.
कौल मान्य – डॉ. पाटील
मागील ४० वर्षांच्या कारकीर्दीत उस्मानाबाद जिल्हा व लोकसभा मतदारसंघातील जनतेने माझ्यावर अलोट प्रेम केले. या प्रेमाच्या शक्तीमुळेच सर्वागीण विकासात मला योगदान देता आले. याचे समाधान जीवनभर राहील. यापुढेही सर्वाच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करणार आहे. जनताजनार्दनाचा कौल मान्य करीत विजयी उमेदवार प्रा. गायकवाड यांना शुभेच्छा देताना जिल्ह्याच्या विकासास आपले सहकार्य राहील, अशी प्रतिक्रिया मावळते खासदार डॉ. पाटील यांनी दिली.              पद्मसिंहांची सद्दी संपली!                                                                                      सात वेळा आमदार आणि एकदा खासदार, मधली अनेक वर्षे राज्य सरकारमध्ये विविध खात्यांचे मंत्रिपद अशी चढत्या कमाने कारकीर्द लाभलेल्या पद्मसिंह पाटील यांना पराभव कधी ठाऊक नव्हता. या लोकसभेत मात्र पहिल्यांदा, तेही तब्बल २ लाख ३१ हजार मतांनी त्यांना पराभवाची धूळ चाखावी लागली.
तेरणा सहकारी साखर कारखाना घोटाळ्यानंतर न्या. पी. बी. सावंत यांनी ठेवलेला ठपका, पवन राजेनिंबाळकर हत्याप्रकरण, उस्मानाबाद जिल्हा बँकेतील ओम ट्रेड घोटाळा या बरोबरच नगरपालिकेसह विविध भ्रष्टाचारांच्या प्रकरणामुळे बदनाम झालेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते डॉ. पद्मसिंह पाटील यांनी निवडणुकीच्या राजकारणात मात्र नेहमीच वर्चस्व राखले. या वेळी मतदारांनी त्यांना पराभवाची धूळ चारली. याआधी उस्मानाबादेत पद्मसिंहांचे निर्विवाद वर्चस्व विरोधकांना कधीही कमी करता आले नाही. या वेळी ती किमया घडली. काँग्रेस नेत्यांसह बार्शी व औसा या दोन्ही विधानसभा मतदारसंघांतून शिवसेनेचे प्रा. रवींद्र गायकवाड यांना मतांची निर्णायक आघाडी मिळाली आणि पद्मसिंहांची सद्दी संपली.
आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात भू-विकास बँक निवडणुकीने करणाऱ्या पद्मसिंहांचा आताचे लोकायुक्त पी. बी. गायकवाड यांनी पराभव केला होता. १९७४ मध्ये जि. प. निवडणुकीत पाटील पहिल्यांदा निवडून आले व सभापती, उपाध्यक्ष झाले. १९७८ मध्ये आमदार झाल्यावर १९८० ला तेरणा कारखाना ताब्यात घेतला. तेव्हापासून सुरू झालेल्या त्यांच्या राजकीय घोडदौडीला आताच्या दणदणीत पराभवाने अखेर लगाम घातला.