मुंबई : मोसमी पावसाचे केरळमध्ये २९ मे रोजी आगमन झाल्यानंतर आता पुढील काही दिवसांत त्याचे महाराष्ट्रातील आगमन होईल. यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी १०१ टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असली तरी वाऱ्याचा वेग कमी असल्याने जूनमध्ये पावसाचा खंड पडण्याचा अंदाज कृषी हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे.

भारतीय हवामान विभागाने यंदा महाराष्ट्रात सरासरी १०१ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर संपूर्ण देशात जून ते सप्टेंबर या कालावधीत  १०३ टक्के पर्जन्यमानाची शक्यता आहे. कमाल तपमान, सकाळ व दुपारची सापेक्ष आद्र्रता, वाऱ्याचा ताशी वेग, सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकषावर हा अंदाज आधारित आहे.

जून महिन्यात वाऱ्याचा वेग कमी होणार आहे. त्यामुळे पावसात खंड पडण्याची शक्यता आहे. जुलैच्या दुसऱ्या पंधरवडय़ापासून ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण चांगले राहील. कमी दिवसांत अधिक पाऊस आणि काही काळ पावसात मोठा खंड पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती ज्येष्ठ कृषी हवामानतज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिली.

शेतकऱ्यांना काळजीचे कारण नाही

मोसमी पावसाचा मुख्य प्रदेश समजल्या जाणाऱ्या मध्य भारतात, जेथे शेती मुख्यत्वे पावसावर अवलंबून आहे, तेथे पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडण्याची शक्यता आहे. त्यात राज्याचा काही भाग येतो. त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याचे कारण नाही, अशी माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली.

१० जूनपासून जोर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येत्या चार आठवडय़ांसाठी पावसाच्या विस्तारित अंदाजानुसार दुसऱ्या आठवडय़ापासून म्हणजे १० जूनपासून  पश्चिम व पूर्व किनारपट्टीवर पाऊस वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.