सातारा : बच्चू कडू यांची प्रकृती खालावली होती. डॉक्टरांनी त्यांना अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. हे आंदोलन थांबवण्यासाठी मी त्यांना संपर्क साधला. उद्याोग मंत्री उदय सामंत यांना अमरावतीला पाठवले. त्यानंतर त्यांनी आंदोलन स्थगित केले आहे. त्यांचे मी आभार मानतो. शेतकरी अन्नदाता आहे. त्यामुळे हे सरकार त्यांच्या पाठीशी ठाम असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
एकनाथ शिंदे दरे तांब (ता. महाबळेश्वर) या आपल्या गावी मुक्कामी आहेत. त्यांनी रविवारी माध्यमांशी संवाद साधला. कडू यांनी आंदोलन कसे मागे घेतले, याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, काही दिवसांपूर्वी मंत्री संजय राठोड यांनादेखील कडू यांची भेट घेण्यासाठी पाठवले होते. मात्र, त्यावेळेस त्यांना यश आले नाही. पुन्हा सामंत यांना देखील त्या ठिकाणी पाठवले. हे सरकार शेतकऱ्यांच्या कायम पाठीशी असून, शेतकरी हा मायबाप आहे, त्याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये ४५ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून आपण अडीच वर्षांमध्ये दिलेले आहेत. त्याच योजना यापुढेही सुरू ठेवण्याचा आमचा मानस आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली देखील जास्त वेगाने आम्ही निर्णय घेतोय, असे शिंदे म्हणाले.
कर्जमाफीबाबत १५ दिवसांत समिती
शेतकरी कर्जमाफीच्या विषयासाठी आता पंधरा दिवसांमध्ये एक समिती गठित होईल आणि समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफीबद्दल निर्णय घेतला जाईल. नवीन कर्ज देण्याच्या संदर्भात किंवा घेतलेले कर्ज पुनर्गठन करण्यासंदर्भात देखील या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन निर्णय घेतला जाईल.