सातारा : सातारा जिल्ह्यात साकारल्या जाणाऱ्या नवीन महाबळेश्वर प्रकल्पाला गती देण्यासाठी नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त केलेल्या एमएसआरडीसीचे कार्यालय महाबळेश्वर येथे सुरू करावे, असे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.शिंदे हे दरे या त्यांच्या मूळ गावी आले असता, त्यांनी या भागातील पर्यटनवाढीच्या दृष्टीने सुरू असलेल्या विविध विकासकामांचा विशेष बैठक घेऊन आढावा घेतला. त्या वेळी त्यांनी हे निर्देश दिले.

सातारा जिल्ह्यातील दरे, मुनावळे, तसेच कोयना नदीलगत असलेल्या २१४ गावांत नव्याने विकसित करण्यात येणाऱ्या नवीन महाबळेश्वर विस्तारित प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांचा शिंदे यांनी या बैठकीत आढावा घेतला.नव्याने विकसित केल्या जाणाऱ्या पर्यटन स्थळाचे विकास प्राधिकरण म्हणून एमएसआरडीसीची नियुक्ती केली असल्याने या भागाचा सुनियोजितपणे विकास करण्याची जबाबदारी एमएसआरडीसीची आहे. त्यांचे कार्यालय साताऱ्यात असल्याने स्थानिकांना तिथे वारंवार जाणे अवघड होत होते. स्थानिक ग्रामस्थांची ही अडचण सोडवण्यासाठी एमएसआरडीसीचे कार्यालय तत्काळ महाबळेश्वरमध्ये सुरू करण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले.

हेही वाचा >>>‘खंडणीच्या आड आल्याने देशमुख यांची हत्या’; युक्तिवादात विशेष तपास पथकाचा संशय

तसेच या वेळी ग्रामस्थांनी कोयना नदीपात्रातील पाणी स्थिर असल्याने येथे चालवण्यात येणाऱ्या बोटींना समुद्रातील बोटींप्रमाणे नव्हे, तर वेगळे नियम लावावेत, अशी मागणी केली. या बोटींना लावण्यात येणारे काही नियम दुरुस्त करून नवीन नियम तयार करावेत, असे सुचवले. त्याबाबत हे नियम तपासून त्यात आवश्यक ते बदल करावेत, असे शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून इथे कोयना नदीवरील पुलाचे, तसेच प्रतापगड आणि तापोळा येथे रस्तारुंदीकरण आणि पर्यटक गॅलरीचे काम सुरू असून, या कामांची प्रगती त्यांनी जाणून घेतली. तसेच या कामांचा वेग वाढवून ती लवकरात लवकर पूर्ण करावीत, असेही सांगितले.

हेही वाचा >>>भास्कर जाधव यांना शिंदे गटाचा थेट प्रस्ताव; रत्नागिरी जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग

या गावात नव्याने विकसित होणाऱ्या पर्यटनस्थळी स्थानिक नागरिकांना उपजीविकेचे साधन मिळावे यासाठी त्यांना तात्पुरत्या स्वरूपात तंबूमध्ये होम स्टे उभारण्याची परवानगी द्यावी. तसेच त्यासाठी लागणाऱ्या बांधकाम परवानग्या द्याव्यात, असेही सांगितले. तसेच कोयना तीरावर बांबू, तसेच इतर झाडांच्या लागवडीला प्रोत्साहन द्यावे, असेही सांगितले.

यासोबतच प्रतापगड किल्ल्यावर सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने हे काम तातडीने थांबवण्याचे निर्देश दिले होते. प्रतापगड हे शिवछत्रपतींची पावनभूमी असल्याने इथे निकृष्ट दर्जाचे काम खपवून घेणार नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. या ठिकाणी नव्याने होणारे कामही दर्जेदारच व्हायला हवे, असेही निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले. तसेच कोयना जलाशयाजवळील मुनावळे, वासोटा किल्ला, तापोळा पट्ट्यातील विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी उपमुख्यमंत्र्यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुनावळे जलपर्यटन प्रकल्पाची पाहणी

या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोयना जलाशयालगत असलेल्या मुनावळे येथील जलपर्यटन प्रकल्प, वासोटा किल्ला परिसर, तसेच तापोळा येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. या वेळी वासोटा येथे लवकरच नाइट टुरिझम सुरू करण्याचे, तसेच पर्यटकांसाठी वॉटर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणाऱ्या नवीन पुलाच्या कामाचीदेखील पाहणी केली. हा पूल जून महिन्यापर्यंत पूर्ण होणार असून, त्याद्वारे तापोळा बामणोली आणि महाबळेश्वर येथील पर्यटनाला मोठी चालना मिळणार असल्याचे शिंदे यांनी या वेळी बोलताना स्पष्ट केले.