विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांची अपेक्षेप्रमाणे निवड झाल्याने आज होणाऱ्या विश्वासदर्शक ठरावाचा फक्त औपचारिकता शिल्लक राहिल्याचं चित्र दिसत आहे. अध्यक्षपदाची निवडणूक, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मागील काही दिवसांमधील निर्णय या साऱ्या मुद्द्यावरुन शिवसेना विरुद्ध शिंदे गट आणि भाजपा असा संघर्ष सुरु असल्याचं चित्र दिसत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचं समर्थन करणारे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी रविवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबद्दल थेट प्रसारमाध्यमांसमोर नाराजी व्यक्त केली.

नक्की वाचा >> “भगतसिंग यांच्या फाशीनंतर ब्रिटिशांना आनंद झाला तसा…”; शिवसेनेकडून कठोर शब्दांमध्ये राज्यपाल कोश्यारींवर टीका

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“एक नंबरचा बोगस राज्यपाल”
विधानभवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना भुयार यांनी स्पष्ट शब्दांमध्ये भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली. यावेळेस बोलताना कोश्यारी म्हणजे स्वातंत्र्यापासून महाराष्ट्राला मिळालेल सर्वात बोगस राज्यपाल असल्याचं म्हटलंय. “हे राज्यपाल फार विचित्र माणूस आहे. हे राज्यपाल कुठून आले, कसे आले, कोणी आणले त्यांचं त्यांनाच माहिती,” असा टोला भुयार यांनी पत्रकारांशी बोलताना लगावला. पुढे त्यांनी, “जेवढे काही राज्यपाल महाराष्ट्राला स्वातंत्र्यापासून लाभले आहेत, त्यातला एक नंबरचा बोगस राज्यपाल म्हणजे हा राज्यपाल आहे. त्याच्यामुळे याच्यावर न बोलेलं बरं,” अशा शब्दांमध्ये कोश्यारींवर टीका केली.

शरद पवारांचाही टोला…
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शपथविधी सोहळ्यादरम्यान पेढा खायला घालतानाचा राज्यपालांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही राज्यपाल कोश्यारींना टोला लगावला आहे. ‘मी अनेक शपथविधी सोहळ्यात सहभागी झालो. मात्र, मला आजपर्यंत कोणत्याही राज्यपालांनी पेढा भरवला नाही किंवा पुष्पगुच्छ दिले नाही’. असं म्हणत पवारांनी राज्यपालांना लक्ष्य केलं.

नक्की वाचा >> मध्यावधी निवडणुकीसाठी तयार राहा, ‘या’ दोन कारणांमुळे शिंदे सरकार केव्हाही पडू शकते; शरद पवारांनी दिला इशारा

पवारांनी शपथ घेताना केलेल्या त्या उल्लेखाचाही दिला संदर्भ
“मी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा दूरचित्रवाणीवर पाहिला. राज्यपाल त्यांना पेडा खाऊ घालत होते आणि पुष्पगुच्छ देत होते. २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे नेते जेव्हा शपथ घेत होते तेव्हा, मी तिथे उपस्थित होतो. आमच्या एका सदस्याने बाबासाहेब आंबेडकर व इतरांना स्मरण करुन शपथेला सुरुवात केली तर त्यांना याच राज्यपालांनी परत शपथ घ्यायला लावली. राज्यपालांनी मलाही नियमांनुसारच मला शपथ घेण्यास सांगितले. मात्र, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत आनंद दिघे यांचा उल्लेख केला. परंतु, राज्यपालांनी त्यावेळी आक्षेप घेतला नाही,” असंही पवार म्हणाले. त्यांनी राज्यपाल आणि त्यांचे कार्यालय आणि राज्य सरकार यांच्यातील संबंधांवरही तीव्र नाराजी व्यक्त केली.

१२ आमदारांवरुनही नाराजी…
“आघाडी सरकारने राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची नावे मंत्रीमंडळाचा प्रस्ताव करुन पाठवला होता. मुळात मंत्रीमंडळाने दिलेल्या प्रस्तावाला राज्यपालांनी मान्यता देणे हे बंधनकारक असते असं असताना जवळपास अडीच वर्ष त्यांनी तो प्रस्ताव तसाच ठेवला व कोणताही निर्णय घेतला नाही. आता राज्यात नव्याने सरकार स्थापन झाल्यानंतर लवकरच याबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले. राज्यपालांचा हा निर्णय लोकशाहीला कितपत योग्य आहे याची चर्चा करायची गरज नाही. लोकांना हे सर्व ठाऊक आहे,” असे म्हणत शरद पवार यांनी राज्यपालांच्या एकंदरीत कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra bhuyar on governor bhagat singh koshyari scsg
First published on: 04-07-2022 at 08:42 IST