Devendra Fadnavis Announces Maharashtra Flood Relief Package : महाराष्ट्राती अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेक भागांत शेती, घरांसह शेतीपिकांचं नुकसान झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदतीच्या पॅकेजची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांसाठी तब्बल ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे. याबाबत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत घेत ही घोषणा केली आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतीचं आणि शेतकऱ्यांच्या घरांचं, शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अनेक ठिकाणी जमीनही खरडून गेली. त्यामुळे आता पुढच्या रब्बीचे पिकेही त्या ठिकाणी घेता येणार नाहीत. मात्र, शेतकरी पुन्हा आपल्या पायावर उभा राहिला पाहिजे. त्यामुळे शेतकऱ्यांना आम्ही जास्तीत जास्त मदत कशी देता येईल यासाठी आता निर्णय घेतला आहे. राज्यात १ कोटी ४३ लाख ५२ हजार हेक्टर जमिनीवर लागवड झाली होती. त्यापैकी ६८ लाख ७९ हजार ७५६ हेक्टर जमिनीवरील पिकांचं नुकसान झालं आहे. आता आम्ही ज्या ठिकाणी मदत करत आहोत, त्यामध्ये २९ जिल्हे, २५३ तालुके आणि २०५९ मंडळांचा समावेश आहे”, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

“एकूण सर्व प्रकारची मदत आपण करत आहोत. खरडून गेलेली जमीन, शेती पिकांचं नुकसान, मृत जणावरांबाबत मदत असेल, जखमी झालेल्या व्यक्तींना मदत असेल, तसेच आपण तात्काळ १० हजार रुपये देत आहोत, ती मदत असेल किंवा यामध्ये ज्या घरांचं संपूर्ण नुकसान झालेलं आहे, त्या घरांसाठी आता आपण नव्याने घरे बांधण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आपण ती घरे बांधणार आहोत. डोंगरी भागातील ज्या घरांचं नुकसान झालं आहे, त्या घरांना आपण प्रत्येकी १० हजारांची जास्त मदत करत आहोत. तसेच शेतकऱ्यांच्या गोठ्यांचं नुकसान झालेलं असेल तर त्यांनाही आपण मदत करणार आहोत. ज्या दुकानदारांचं जे नुकसान झालेलं आहे, त्यांनाही आपण मदत करत आहोत”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

शेतकऱ्यांना कशी मिळणार मदत?

१. १ कोटी ४३ लाख ५२ हजार २८१ हेक्टर जमिनीवर लागवड
२. त्यापैकी ६८ लाख ६९ हजार ७५६ हेक्टर जमिनीवरच्या पिकांचं नुकसान
३. काही जमिनींवर अंशत: पण मोठ्या प्रमाणावर पूर्णत: नुकसान
४. साधारण २९ जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान, २५३ तालुक्यांमध्ये सरसकट मदत होणार
५. ६५ मिलिमीटरची अट ठेवलेली नाही.
६. १०० टक्के घरं गेलेल्या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेत पूर्णपणे नवीन घर समजून पैसे दिले जातील.
७. अंशत: पडझड झालेल्या घरांनाही मदत
८. दुकानांचं नुकसान झालंय. ५० हजारांपर्यंतची मदत केली जाईल
९. दुधाळ जनावरांसाठी ३७ हजार ५०० रुपयांपर्यंत प्रती जनावर मदत
१०. एनडीआरएफमधील तीन जनावरांची मर्यादा काढली आहे.
११. ओढकाम करणाऱ्या जनावरांसाठी ३२ हजार रुपये प्रतिजनावर
१२. कोंबड्यांसाठी १०० रुपये प्रतिकोंबडी मदत दिली जाईल
१३. खरडून गेलेल्या जमिनींसाठी ४७ हजार रुपये हेक्टरी रोख आणि ३ लाख रुपये हेक्टरी नरेगाच्या माध्यमातून दिले जातील.
१४. बाधित विहिरींसाठी विशेष बाब म्हणून ३० हजार रुपये प्रतिविहीर दिले जातील.
१५. पायाभूत सुविधांच्या नुकसानीची भरपाई म्हणून १० हजार कोटींची तरतूद.
१६. दुष्काळावेळच्या सर्व उपाययोजना ओला दुष्काळ समजून केल्या जातील. त्या जमीन महसुलात सूट, कर्जाचं पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाची वसुली, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी अशा सर्व गोष्टी लागू केल्या आहेत.
१७. पीकनुकसान भरपाईसाठी ६५ लाख हेक्टर जमिनीसाठी ६१७५ कोटी रुपये देण्याचा निर्णय
१८. रबीच्या पिकासाठी प्रतिहेक्टरी अतिरिक्त १० हजार रुपये दिले जातील.
१९. एकूणमध्ये कोरडवाहूसाठी हेक्टरी १८ हजार ५००, हंगामी बागायतीला २७ हजार तर बागायती शेतकऱ्याला ३२ हजार ५०० रुपये हेक्टरी देण्याचा निर्णय
२०. ४५ लाख शेतकऱ्यांचा विमा उतरवला आहे. त्यांना वरील मदतीव्यतिरिक्त पूर्ण नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना साधारण १७ हजार हेक्टरी विम्याचे पैसे मिळतील.
२१. राज्य सरकारच्या वतीने नुकसान भरपाईसाठी एकूण ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज दिलं जात आहे.