मराठवाड्यात कॅबिनेटची जी बैठक पार पडते आहे त्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही जनतेच्या पैशांची उधळपट्टी आहे असं म्हटलं आहे. मराठवाड्यात जाऊन फक्त घोषणा करतील बाकी काहीच नाही असं त्यांनी म्हटलं आहे. तर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीही अशीच टीका केली आहे. या सरकारकडून फक्त घोषणाबाजी सुरु आहे, मराठवाड्यातही तशाच घोषणा दिल्या जातील, ५० हजार कोटींचं पॅकेज वगैरे जाहीर केलं जाईल. प्रत्यक्षात कुठलीही योजना अमलात येणार नाही असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. या सगळ्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. काय म्हटलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी? "मंत्रिमंडळाची याआधीची जी बैठक आम्ही संभाजी नगरमध्ये घेतली होती त्यातले जवळपास सगळ्या निर्णयांची अमलबजावणी झालेली आहे. त्याची माहितीही आम्ही पत्रकारांना देणार आहोत. दुसरं जे लोक आज हे म्हणत आहेत की मागच्या बैठकीत काय झालं? त्यांना माझा सवाल आहे, अडीच वर्षात तु्म्ही मराठवाड्यासाठी काय केलं? तुम्ही सरकारमधे होतात. एखादा निर्णय मागे राहिला असेल तर पूर्ण करण्याची जबाबदारी तुमची होती. तुम्ही अडीच वर्षे माशा मारत होतात का? मराठवाडा वॉटरग्रिडचा मुडदा पाडण्याचं काम ज्या सरकारने केलं आता तेच लोक आम्हाला विचारत आहेत. जे दिलं होतं त्याचाही मुडदा पाडला. यांना मराठवाड्याशी घेणंदेणं नाही. जर मराठवाड्याच्या हितासाठी बैठक होत असेल तर ती हाणून कशी पाडायची हा यांचा कावा आहे हे कावेबाज लोक आहेत." असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. नाना पटोलेंनी काय म्हटलं होतं? छत्रपती संभाजीनगर मध्ये महाराष्ट्र कॅबिनेटची बैठक पार पडते आहे. मात्र या सरकारकडून अपेक्षा ठेवू नये असंच चित्र आज आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठवाडा विकासासाठी ४२ हजार कोटींची घोषणा केली होती, त्याचं काय झालं? फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बैठका घेण्याच्या निर्णयाचा मी तीव्र निषेध करतो आहे. महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या कालावधीत ३५ टक्के व्यवसाय वृद्धी झाली तर ४२ टक्के रोजगार निर्मिती झाली. उद्योग, व्यवसायांना चालना मिळाली होती. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र विकासाकडे नेला होता असं नाना पटोलेंनी म्हटलं. आदित्य ठाकरे काय म्हणाले? या सरकारला सामान्य जनतेशी, त्यांच्या प्रश्नांशी काहीही घेणंदेणं नाही. कुठलं मंत्रिपद कुणाला? कुणाला किती निधी मिळणार? हेच प्रश्न घेऊन हे आपसात चर्चा करत बसले आहेत. मराठवाड्यात जाऊन पॅकेजची घोषणा केली जाईल. पण प्रत्यक्षात काहीही होणार नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना करोनाचा काळ होता. तरीही आपण राज्यातले उद्योग हे बाहेर जाऊ दिले नव्हते. या सरकारच्या काळात लोकांना आश्वासनांशिवाय काहीही मिळालेलं नाही. शेतकऱ्यांना तर सरकारने एक रुपयाचीही मदत केलेली नाही असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं होतं. आता या सगळ्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.