Bhagyashree Atram Joins Sharad Pawar NCP: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते व सरकारमधील मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांनी मुलगी भाग्यश्री अत्राम यांच्यावर आगपाखड केली आहे. भाग्यश्री अत्राम यांनी गुरुवारी शरद पवार गटात प्रवेश केला. आता भाग्यश्री अत्राम या धर्मराव बाबा अत्राम यांच्याविरोधात उभ्या राहणार असल्याचंही बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी रात्री उशीरा माध्यमांशी बोलताना धर्मराव बाबा अत्राम यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी लेकीवर आगपाखड करतानाच शरद पवारांनाही याचा दोष दिला.

काय म्हणाले धर्मराव बाबा अत्राम?

धर्मराव बाबा अत्राम यांनी यावेळी खोचक शब्दांत भाग्यश्री अत्राम यांना शुभेच्छा दिल्या. “चांगलंय. नवीन पक्ष, नवीन काम त्यांनी हातात घेतलंय. अपेक्षा करू की काहीतरी चांगलं घडेल. त्या म्हणतात त्या नवदुर्गा आहेत. मग नवदुर्गा तर माझ्या घरातही बसलेली आहे. माणूस देवी बनू शकत नाही. त्या जे बोलल्या, ते बघू पुढे. माझ्याविरोधात उभ्या राहू द्या, पण त्यांनी जिंकूनही आलं पाहिजे”, अशी खोचक टिप्पणी धर्मराव बाबा अत्राम यांनी केली.

dharmarao baba atram on daughter bhagyashree atram
धर्मरावबाबा अत्राम यांची मुलगी भाग्यश्री अत्राम शरद पवार गटात जाणार (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

“मी त्यांना शिकवण्यात कमी पडलो”

दरम्यान, भाग्यश्री अत्राम यांनी भाषा सुधारायला हवी असं म्हणतानाच आपण त्यांना शिकवण्यात कमी पडलो, असंही धर्मराव बाबा अत्राम यावेळी म्हणाले. “माझा त्यांना पूर्ण आशीर्वाद आहे. त्यांची भाषा सुधारली पाहिजे. त्या राजकारणात नवीन आहेत. इतकी वर्षं सोबत होत्या, त्यांनी काहीतरी शिकलं पाहिजे होतं. ठीक आहे. आवेशात बोलल्या असतील किंवा कुणीतरी सांगितल्याने बोलत असतील. बघू. नवीन पिढीत काहीतरी करण्याचा उत्साह असतो. चांगलं आहे. पण आपण बोलत असताना मर्यादा ठेवून बोललं पाहिजे हे मी त्यांना शिकवू शकलो नाही ही माझी चूक आहे”, अशा शब्दांत त्यांनी लेकीवर टीका केली.

“मी मागे बोललो की आमच्याकडे पद्धत असते. वरिष्ठांनी बोलल्यानंतर सगळ्यांनी थांबायला हवं. पण ठीक आहे, आता नवीन लोकांसोबत त्या जोडल्या गेल्या आहेत. नवीन पक्षात त्या गेल्या आहेत. काहीतरी चांगलं होईल अशी अपेक्षा करू आपण”, असं ते म्हणाले.

“मी ५० वर्षं लोकांसाठी काम केलं आहे”

दरम्यान, यावेळी माध्यम प्रतिनिधींनी जयंत पाटलांच्या विधानाचा संदर्भ देऊन त्यांना प्रश्न विचारला. ‘एक बाबा गेले तरी शरद पवारांसारखे दुसरे बाबा पाठिशी आहेत’, या त्यांच्या विधानाबाबत विचारताच धर्मराव बाबा अत्राम यांनी त्यावरूनही मुलीवर टीका केली. “ठीक आहे. त्यांनी स्वत:चे वडील सोडून नवीन वडील त्यांनी शोधले असतील. बघू काय करतात ते. आपण लोकांसाठी ५० वर्षं काम केलं आहे. अहेरीत सभांमध्ये काय फरक पडला हे सगळ्यांना माहिती आहे. मी त्यावर जास्त बोलायची गरज नाही”, असं ते म्हणाले.

Dharmarao Baba Atram Daughter: “जी बापाची झाली नाही, ती तुमची काय होणार?”, मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांची लेकीवर टीका!

“घोडा-मैदान आता समोरच आहे. बघू. त्या राजकारणात नवीन आहेत. त्यांनी आठ वर्षं काम केलंय, मी ५० वर्षं काम केलंय. ठीक आहे. त्यांना अजून ४२ वर्षं काम करायचंय. त्या लोकसभा मतदारसंघात फिरलेल्या नाहीत. सगळी कामं मीच केली. लोक त्यांचा निर्णय दोन महिन्यांत देतीलच”, असं अत्राम म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“…मग मी काय हवेत गेलो होतो का?”

मधल्या काळात आपणच गडचिरोली जिल्हा सांभाळला, असा भाग्यश्री अत्राम यांचा दावाही त्यांनी खोडून काढला. “ठीक आहे. मग मी कुठे होतो? हवेत गेलो होतो का? भारतातच तर होतो, जिल्ह्यातच तर होतो. आणखी कुठे होतो?” असा खोचक सवाल त्यांनी लेकीला केला आहे.