महायुतीत मनसेच्या रूपाने चौथा भिडू सहभागी करावा की नाही, याविषयी शिवसेना आणि रिपाइं यांच्यातील मतभेद पुन्हा एकदा समोर आले. शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी सत्ता खेचून आणण्यात सेना-भाजप-रिपाइं यांची महायुती सक्षम असल्याचे सांगून चौथ्या भिडूची गरज नसल्याचे स्पष्ट केले, तर रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी पक्षाच्या भूमिकेत बदल झाल्याचे सांगून आता महायुतीमध्ये चौथ्या भिडूचे स्वागत केले जाईल, असे सांगितले.शनिवारी येथे झालेल्या उभय नेत्यांच्या वेगवेगळ्या पत्रकार परिषदांमधये महायुतीतील मनसेबाबतच्या भूमिकांचा युतीतील विरोधाभास ठळकपणे समोर आला.
लोकसभेसाठी रिपाइंने केलेल्या सहा जागांच्या मागणीबाबत बोलताना राऊत यांनी त्यांना जागा मागण्याचा अधिकार असल्याचे सांगितले.
ते म्हणाले की, रिपाइंच्या मागणीवर तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा होईल आणि मग निर्णय घेतला जाईल. शिवसेनेच्या मुखपत्रातून नरेंद्र मोदी यांना दिल्या गेलेल्या कानपिचक्यांवरून पुन्हा एकदा घुमजाव करण्याची वेळ सेनेवर आली. मोदी यांच्यावर शिवसेनेने कधी टीका केलेली नाही. यापूर्वी त्यांना कधी विरोध नव्हता. २०१७ पर्यंत गुजरातची सेवा करायची, हे सांगून मोदी यांनी शालेय विद्यार्थ्यांची समजूत काढली. अशीच समजुत त्यांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचीही काढावी लागेल.
पुणे शहर, सातारा, लातूर, अमरावती, रामटेक, दक्षिण-मध्य मुंबई या सहा जागांची मागणी रिपाइंने शिवसेनेकडे केली असून, त्यापैकी दक्षिण-मध्य मुंबईसह किमान तीन जागा मिळाव्यात, असा आमचा आग्रह राहणार असल्याचे रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.
यापूर्वी मिळणाऱ्या पंढरपूर व शिर्डी या दोन जागा रिपाईला येत्या निवडणुकीत नको आहेत.
उदयनराजेंना आवाहन
खासदार उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून साताऱ्यातून तिकीट मिळण्याची शक्यता नाही. यामुळे भोसले यांनी रिपाइंच्या तिकीटावर साताऱ्याची निवडणूक लढवावी, असे आवाहन आठवले यांनी केले.