मागील काही दिवसांपासून विदर्भात मुसळधार पाऊस सुरू होता. अशातच मध्यप्रदेशातील संजय सरोवर प्रकल्पातील पाणी सोडल्याने गोसिखुर्द प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडावे लागले. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी, सावली तालुक्यातील अनेक गावांसह इतर ठिकाणी मोठ्याप्रमाणात पूर आल्याने हजारो हेक्टर शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. याशिवाय घराघरात पाणी शिरल्याने अन्न धान्य, घरात असलेल्या साहित्यचे  देखील नुकसान झाले. या पूरग्रस्तांना अन्न-धान्य, कपडे व  आवश्यक साहित्यासाठी दहा हजार रुपयांची तातडीने मदतीचे वाटप आजपासून सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करताना दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्यप्रदेशातील संजय सरोवर प्रकल्पाचे पाणी सोडल्याने गोसिखुर्द प्रकल्पाचे पूर्ण दरवाजे पाच मीटर पर्यंत उघडावे लागले. त्यामुळे १९९५ पेक्षाही भीषण महापूर पूर्व विदर्भातील भंडारा, नागपूर, चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात आल्यामुळे अनेक गावे जलमय झाली. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले. या महापुरात शेतकऱ्याचे पाळीव जनावरे वाहून गेली तर काही मृत्यमुखी पडली. तर अनेक घराघरात पाणी गेल्याने घरातील अन्न धान्य, कपडे, साहित्य यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी तालुक्यात तळ ठोकून स्वतः पूरग्रस्त भागाची पाहणी बोट व हेलिकॉप्टरद्वारे करून या भीषण परिस्थितीची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली.

तसेच, वडेट्टीवार यांनी पुरामध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी व अन्न धान्य पोहचविण्यासाठी एनडीआरएफ व एसडीआरफच्या टीमला पाचारण केले.  या पुरग्रस्तांना तातडीने मदत मिळण्यासाठी महाविकासआघाडी सरकारच्यावतीने अन्न धान्यासाठी पाच हजार रुपये व कपडे व अन्य साहित्यासाठी पाच हजार रुपये या प्रमाणे दहा हजार रुपयांच्या प्रारंभिक मदतीचे वाटप आजपासून करण्यात येत आहे, अशी माहिती  वडेट्टीवार यांनी दिली.  त्यांनी पुढे सांगितले की, ही प्रारंभिक मदत असून अधिकाऱ्याकडून प्रत्यक्ष पंचनामे केल्यानंतर भरीव मदत सरकारकडून करण्यात येणार आहे . मदतीसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.

प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला दहा हजार रुपयांची मदत मिळणार –

ब्रह्मपुरी तालुक्यातील पूरग्रस्त भागातील गावांसाठी पाच कोटी रुपयांची तात्काळ मदत देण्यासोबतच प्रत्येकी पुरग्रस्त कुटुंबाला दहा हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचे निर्देश  चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले. शासकीय विश्रामगृह ब्रह्मपुरी येथे पार पडलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Distribution of emergency aid to flood victims in chandrapur district started msr
First published on: 01-09-2020 at 21:15 IST