लोकसत्ता प्रतिनिधी सोलापूर: मागील सलग तीन वर्षे भरभरून पाऊस पडला होता. परंतु यंदा पावसाळा दीड महिन्यात कोरडाच चालल्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे. त्यामुळे वरूणराजाची कृपा होण्यासाठी अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी गावात ग्रामस्थांनी चक्क 'गाढवाचं लगीन' उरकलं. यंदाच्या पावसाळ्यात मृग, आर्द्रापाठोपाठ पुनर्वसू नक्षत्राच्या सरीही कोसळत नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. पाऊस पडण्यासाठी ग्रामीण भागात वरूणराजाची करूणा भाकली जात आहे. शिवाय अन्य वेगवेगळे पारंपारिक प्रकारही केले जातात. 'गाढवाचं लगीन' हा त्यातला एक प्रकार आहे. आणखी वाचा-सांगली: कत्तलीसाठी डांबलेल्या ६७ जनावरांची मुक्तता, गुन्हा दाखल अक्कलकोट तालुक्यात मैंदर्गीसारख्या गावात वरूणराजाला प्रसन्न करण्यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येऊन 'गाढवाचं लगीन' लावले. त्यासाठी समाज माध्यमांद्वारे पंचक्रोशील मंडळींनि निमंत्रण पत्रिकाही धाडण्यात आल्या होत्या. ठरल्याप्रमाणे मगळवारी दुपारी १.३० वाजता गावातील शिवचलेश्वर मैदानावर गाढवाचं लगीन उरकण्यात आले. तत्पूर्वी नर- मादी वधू- वर गाढवांना सजवून हळद लावण्यात आली आणि शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत मंगलाष्टका म्हटल्या गेल्या. नववधूवर गाढवांची वाजतगाजत वरातही काढण्यात आली.