२००४ ते २०१४ या कालावधीत देशात युपीएचं सरकार होतं. या सरकारमध्ये प्रत्येक गोष्टीसाठी काहीही निर्णय घ्यायचा असेल तर धोरण लकवा मारला गेला होता हे आपण पाहिलं आहे. तसंच या कालावधीत जे सरकार होतं त्या सरकारमधले सगळे मंत्री स्वतःला पंतप्रधान समजत होते आणि पंतप्रधान असलेल्या मनमोहन सिंह यांना कुणीही पंतप्रधान समजत नव्हतं असं म्हणत अमित शाह यांनी पुण्यात भाषण केलं. पुण्यात मोदी @20 या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं त्यावेळी अमित शाह यांनी म्हटलं आहे.
काय म्हटलं आहे अमित शाह यांनी?
२००४ ते २०१४ या कालावधीत देशात सरकारला धोरण लकवा मारला होता. हे सरकार असं होतं की प्रत्येक मंत्री स्वतःला पंतप्रधान मानत होता आणि पंतप्रधानांना कुणीही पंतप्रधान मानायला तयार नव्हती. दहशतवादी रोज आपल्यावर हल्ला करू लागले होते. लष्कराच्या जवानांना त्रास देत होते. विदेशातही आपल्या देशाचे पंतप्रधान असलेल्या मनमोहन सिंह यांना काही सन्मान नव्हता. २०१४ च्या निवडणुका लागल्या तेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार होते. त्यावेळी मोदी लाट आली आणि संपूर्ण देशाने मोदींना निवडून दिलं. २०१४ मध्ये जेव्हा भाजपाचं सरकार आलं तेव्हापासून आजपर्यंत अनेक प्रकाराचं चांगलं परिवर्तन देशात झालं असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे.
मोदींचं राजकारणात येणं योगायोग नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राजकारणात येणं हा काही योगायोग नाही. त्यांची मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून जी कारकीर्द आहे तर त्याआधीचा त्यांचा ३० वर्षांचा त्याग आणि तपश्चर्या हे सगळं लक्षात घेतलं पाहिजे. मोदीजी आमचे प्रेरणास्रोत कसे झाले? त्यांनी काय काय केलं? कसा संघर्ष केला? गरीबातल्या गरीब घरांमध्ये भाजपा कशी पोहचवली हे सगळं आपल्याला समजून घेतलं पाहिजे असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.
मोदींकडे लोकांच्या समस्या सोडवण्याची कला
नरेंद्र मोदी यांना जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री करण्यात आलं तेव्हा त्यांनी एकही निवडणूक लढवली नव्हती. त्यांच्या मनात किती प्रश्न असतील विचार करा. मात्र लोकांच्या समस्या सोडवण्याची कला त्यांच्याकडे आहे. माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते त्यांनी घडवले. भारतमातेची सेवा करणं हाच उद्देश त्यांनी डोळ्यासमोर ठेवला होता असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे. गुजरातचा विकास त्यांनी खूप चांगल्या प्रकारे केला त्याचा मी साक्षीदार आहे. ग्रामीण विकासाचे अध्याय आधी गुजरातमध्येच लिहिले गेले. विविध प्रकारचा विकास केला गेला. दहशतवादाला उत्तर दिलं गेलं. त्यामुळे मोदीजी १३ वर्षात एक आदर्श ठरत गेले. २०१४ मध्ये जेव्हा हे ठरलं की मोदींच्या नेतृत्त्वात लोकसभा निवडणुका लढवायच्या आहेत तेव्हा संपूर्ण देश आनंदी झाला असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे.
मोदींनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आहे
मोदीजी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा आपल्या कार्यातून देश प्रगती करु शकतो आणि संपूर्ण जगात पहिल्या क्रमांकावर जाऊ शकतो हे शक्य आहे हे मोदींनी दाखवून दिलं. हा काळ भारताच्या राजकीय इतिहासातला सुवर्ण काळ आहे. ७० वर्षे ज्या लोकांनी राज्य केलं त्यावेळी लोक त्रास आणि समस्यांना सामोरे जात होते. मात्र आज ती स्थिती नाही. गरीबांना घरं दिली गेली आहेत. गॅस दिला गेला आहे. मोदींच्या काळातच हे शक्य झालं आहे असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे.