Eknath Khadse on Pranjal Khewalkar: एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना कथित रेव्ह पार्टीत सहभाग असल्याबाबत पुण्यातून अटक करण्यात आली आहे. प्रांजल खेवलकर हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती आहेत. ही बातमी समोर आल्यानंतर एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधताना पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ खडसे म्हणाले, “गेल्या काही दिवसांमध्ये जे वातावरण सुरू होते, त्यावरून असे काहीतरी घडू शकते याचा अंदाज मला येत होता. पुण्यामध्ये जी घटना घडली आहे, ते मी चॅनेलच्या माध्यमातून पाहिले. माझे त्यांच्याशी (प्रांजल खेवलकर) बोलणे झालेले नाही. ते अजून पोलिसांच्या ताब्यात आहेत. जर पुण्यात घडलेली घटना खरोखर रेव्ह पार्टी असेल आणि माझे जावई त्यात असतील तर मी त्या गोष्टीचे समर्थन कधीही करणार नाही.”
तर मी ते सहन करणार नाही – खडसे
एकनाथ खडसे पुढे म्हणाले, “पोलीस यंत्रणेने खरोखर चांगल्या पद्धतीने तपास करायला पाहिजे. परंतु काही ठिकाणी असे होते की, पोलीस यंत्रणा तपास व्यवस्थित करत नाही. अशी जनमानसामध्ये प्रतिमा आहे. जर या प्रकरणामध्ये तथ्य असेल तर जावई असो किंवा कुणीही असो त्याचे समर्थन कधी करणार नाही. परंतु जर जाणूनबुजून अडकविण्याचा प्रयत्न केला असेल तर तेही सहन केले जाणार नाही.”
आमच्यावर अशाप्रकारची काहीतरी कारवाई केली जाईल किंवा ट्रॅप रचला जाईल, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिल्यानंतर गिरीश महाजन यांनी खोचक टोला लगावला. ते म्हणाले, “जर ट्रॅप लावला जाणार आहे, याची कल्पना खडसेंना होती तर त्यांनी जावईबापूंना अलर्ट करायला हवे होते.”
गिरीश महाजन पुढे म्हणाले, “मला वाटते खडसेंच्या म्हणण्याला अर्थ नाही. जे झाले ते मान्य केले पाहिजे. तपासानंतर ज्यांची चूक आहे, त्यांना शिक्षा होईल. काही झाले की, म्हणायचे यात षडयंत्र होते. त्यांनी असे केले, यांनी हे केले. मला वाटते, प्रत्येकवेळी आपल्याबरोबरच षडयंत्र कसे काय होते?”
या कारवाईमागे राजकीय कारण
प्रांजल खेवलकर यांची अटक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) प्रवक्त्या विद्या चव्हाण यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. “मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या नेत्या, महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे आक्रमकपणे सरकारवर टीका करत आहेत. सरकारविरोधात सध्या कुणीही बोलताना दिसला तर त्याला त्रास देण्याऐवजी त्याच्या कुटुंबाला त्रास देण्याची नवी पद्धत सुरु झाली आहे. जे विरोधात बोलतात त्यांना थेट काही करता येत नाही, त्यामुळे कुटुंबियांना लक्ष्य केले जात आहे.” असा आरोप विद्या चव्हाण यांनी केला.