आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पनवेल दौऱ्यादरम्यान भाजपावर आणि एकनाथ शिंदे तसंच अजित पवारांवर कडाडून टीका केली. रायगड आणि मावळ हा मतदारसंघ म्हणजे एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आणि दुसऱ्या बाजूला त्यांची राजधानी. अशा ठिकाणी आपला पवित्र भगवा फडकणार नाही तर मग दुसरं कुठलं फडकं फडकणार? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी भाजपा, शिंदे गट आणि अजित पवार गटावर तुफान टीका केली. तसंच मी पुन्हा येईन या देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा संदर्भत ठाकरी शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही समाचार घेतला. तर एकनाथ शिंदेंचा उल्लेख त्यांनी गद्दारांचा नायक असा केला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

आपल्या भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले, “इथल्या खासदाराने गद्दारी केली आहे त्याला तर आडवा करायचाच पण जे सर्वपक्षीय शेठ आहेत म्हणजे काय ज्यांचं सरकार येतं त्यांच्याकडे जायचं. कुठेही गेलं की आपलं दुकान चालू.. म्हणजे राजकारणातली दुकानदारी करणारे आहेत त्यांची दुकानं बंद करायची आहेत. मी भाजपाबाबत म्हटलं आहे की अब की बार भाजपा तडीपार ते करायचं आहे. कारण इतका खोटारडा पक्ष देशाच्या राजकारणात जन्माला आला नव्हता.”

एकनाथ शिंदेंचा उल्लेख गद्दारांचा नायक

“एवढी फोडाफोडी केली, तरीही कट्टर शिवसैनिक हे शिवसेनेबरोबरच आहेत. त्यांना शिवसेनेने फक्त प्रेम दिलं. माधवराव भिडे इथे आहेत. मी लहानपणापासून त्यांना पाहतोय. शिरीष बुटाला आहेत. बाळासाहेबानंतर इतकी वर्षे झाली पण त्यांनी शिवसेना सोडली नाही. याला म्हणतात निष्ठा. हे जे काही गद्दार आहेत त्या गद्दारांचा नायक आहे त्यालाही विचारा तू दाढी खाजवत जरा आठव.. कारण आपण काही आठवायचं असेल तर डोकं खाजवतो हा दाढी खाजवतो. स्वतःचीच दाढी तू स्वतःच खाजव खरंतर पैसे खूप आहेत दाढी खाजवायलाही माणसं ठेवली असतील तर माहीत नाही. पण तुम्हाला मी काय दिलं नव्हतं? शिवसेनेने देता येईल ते सगळं तुम्हाला दिलं तरीही आमच्या पाठीत वार केला. शिवसेना ही ओळख तुमच्यासमोर आले म्हणून निवडून आलात. यांना वाटलं की घोड्यावर बसलोय म्हणजे घोडा माझाच. आता घोडा कसा लाथ घालतो ते कळेल आता.” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवरही टीका केली.

हे पण वाचा- “…तर तुम्हाला खांदा द्यायला चार लोक तरी जमले असते का?”, उद्धव ठाकरेंची भाजपावर बोचरी टीका

नरेंद्र मोदी म्हणत आहेत काँग्रेसने देशाला लुटलं. कुणाच्या खात्यात किती पैसे आहेत काढा. भाजपाच्या खात्यात सहा ते सात हजार कोटी आहेत. तर काँग्रेसच्या खात्यात किती आहेत? ६०० ते ७०० कोटी आहेत. मग देशाला लुटलं कुणी? मोदी आणि भाजपानेच मागच्या दहा वर्षांत देश लुटला आहे. पीएम केअर फंडात किती पैसे? हे कुणालाही माहीत नाही. करोना काळात तो फंड आला. भाजपाच्या लोकांनीही पीएम केअरला पैसे दिले. तो फंड खासगी असेल तर त्याचा बाप कोण? उद्या इंडियाचा पंतप्रधान झाल्यावर आमच्या पंतप्रधानाला तो फंड विनियोग करता येईल की नाही ते भाजपाने सांगावं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपा हा पक्ष नाही तर सडकी वृत्ती

भाजपाने शिवसेना फोडली. त्यानंतर मोदींनी ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा उल्लेख केला. चार दिवसात अजित पवार तिकडे. निर्मला सीतारमण यांनी श्वेतपत्रिका आणली, त्यात आदर्श घोटाळ्याचा उल्लेख केला. लगेच अशोक चव्हाण तिकडे गेले. हे सगळं जर पाहिलं तर भाजपा हा पक्ष नाही तर सडकी, कुचकी वृत्ती आहे. ही वृत्ती आपल्याला देशातून तडीपार करावी लागेल असंही आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं.