जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाची मागणी करत उपोषणाला बसलेल्या मराठा समाजबांधवांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला. या घटनेनंतर विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. विरोधकांकडून मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर वेगवेगळे आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांना उत्तरं देण्यासाठी, मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकारने आतापर्यंत केलेल्या कामांची माहिती देण्यासाठी आणि लाठीहल्ल्याप्रकरणी सरकारने आतापर्यंत काय कारवाई केली आहे याची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, संबंधित पोलीस अधिकाऱ्याची दुसऱ्या जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. तसेच लाठीहल्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आली आहे. या चौकशी समितीच्या निर्णयानंतर याप्रकरणी कडक कारवाई केली जाईल.

आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यावरून विरोधकांनी थेट मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत. या आरोपांना एकनाथ शिंदे यांनी यावेळी उत्तर दिलं. एकनाथ शिंदे म्हणाले, मुळात अशा प्रकारचा आदेश आम्ही देऊ शकतो का? मराठा समाजाचे लोक आंदोलन करत आहेत आणि त्यांच्यावर लाठीचार्ज करा असा आदेश आमच्यापैकी कोणी देऊ शकतं का?

हे ही वाचा >> “जालन्यात जी लाठीचार्जची घटना घडली त्याबद्दल मी क्षमा..”, देवेंद्र फडणवीस यांची बैठकीनंतर पहिली प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकनाथ शिंदे म्हणाले, विरोधकांकडून हे चुकीच्या पद्धतीने आरोप सुरू आहेत. सरकारला बदनाम करण्याचं काम सुरू आहे. आमच्या सरकारची स्थापना झाल्यापासूनच हा बदनामीचा प्रकार सुरू आहे. परंतु, तेदेखील (विरोधक) यापूर्वी राज्यकर्ते होते. अशा प्रकारचे आदेश दिले जातात का? यावर त्यांनी बोलावं. महाराष्ट्र अशांत करण्याचं काम कोणीही करू नये. अशा प्रकारचे आरोप करणं, यात राजकारण करणं हे चुकीचं आहे. मला सध्या यात राजकारण आणायचं नाही