मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आपल्या भाषणात महाविकासआघाडीच्या बड्या नेत्यांना जोरदार टोले लगावले. सरकारला सबुरीचा सल्ला देणाऱ्या विरोधी पक्षनेते अजित पवारांना लक्ष्य करत एकनाथ शिंदेंनी थेट पहाटेच्या शपथविधीवरच निशाणा साधला. तसेच तुम्ही तेव्हा थोडी घाई केली. जयंत पाटील असते, तर ‘करेक्ट कार्यक्रम’ झाला असता असा खोचक टोला लगावला.

एकनाथ शिंदे म्हणाले, “आम्ही श्रद्ध सबुरीनेच काम करतो आहे. तुम्ही त्यावेळी थोडी घाई केली. तुम्ही थोडं सबुरीने घेतलं असतं तर कार्यक्रम करेक्ट झाला असता. जयंत पाटील यावर हसत आहेत. मला आठवतंय, जयंत पाटील म्हणाले म्हणाले होती की, चुकीचा कार्यक्रम झाला. मला माहिती दिली असती तर करेक्ट कार्यक्रम केला असता. त्यामुळे अजित पवारांनी थोडी घाई केली.”

“…तेव्हा मला आमच्या प्रमुखांचा फोन आला”

“पहाटेचा शपथविधी सुरू होता तेव्हा मला आमच्या प्रमुखांचा फोन आला आणि टीव्ही बघत आहे का विचारलं. मी टीव्ही पाहत होतो आणि अजित पवार शपथ घेत होते. मी म्हटलं हे मागचं कधीचं दाखवत आहेत की काय? त्यावर ते म्हणाले नाही, हे आताचंच आहे. तिथं देवेंद्र फडणवीस देखील दिसले. आमचे प्रमुख म्हटले मी जयंत पाटलांनाही फोन करतोय, ते फोन उचलत नाहीत. मी त्यांना म्हटलं जयंत पाटीलही तेथेच आहेत,” असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.

“मला वाटलं जयंत पाटील देखील तेथे आहेत, मात्र…”

“अनिल पाटील तेथे पाठमोरे होते. मला वाटलं जयंत पाटील देखील तेथे आहेत. मात्र, जयंत पाटील तेथे नव्हते. ते असते तर कार्यक्रम करेक्ट झाला असता. ओके झाला असता,” असंही शिंदेंनी नमूद केलं.

पाहा व्हिडीओ –

“२५ वर्षे कोण टिकतो, आत राहतो, की बाहेर जातो कोण सांगू शकेल?”

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “अजित पवार म्हणाले सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणीच आलेलं नाही. ते खरं आहे, कुणीच सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेलं नाही. शेवटी हे लोकांच्या हातात असतं. काही लोकं म्हणाली आम्ही २५ वर्षे सत्तेत राहणार आहे. २५ वर्षे कोण टिकतो, कोण कुठे जातो, आत राहतो, बाहेर जातो कुठे जातो कोण सांगू शकेल? आम्ही पुढील अडीच वर्षे चांगलं काम करू आणि त्यापुढील पाच वर्षे इकडेच राहू. आम्ही पुढील १०, १५, ५० वर्षांचं काहीही सांगणार नाही.”

हेही वाचा : “हे काय आहे, आम्ही असलेच धंदे केले आहेत आणि…”, अधिवेशनात जयंत पाटील, धनंजय मुंडे आक्रमक, अजित पवार म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“फडणवीस पुन्हा येताना मलाही सोबत घेऊन आले”

“देवेंद्र फडणवीस म्हणाले पुन्हा येईल, पुन्हा येईल. ते पुन्हा आले, पण मलाही सोबत घेऊन आले. आता आम्ही दोघे दोघे आहोत. आधी फडणवीस एकटे सगळ्या विरोधी पक्षांना पुरून उरायचे. आता आम्ही दोघे आहोत. ‘एक से भले दो’. मनात दुसरं काही आणू नका, हे विधायक कामासाठी आम्ही दोघे असं म्हणत आहे,” असंही त्यांनी सांगितलं.