CM Ekath Shinde : आगामी विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असताना महायुतीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यावर राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून ते अजित पवारांपर्यंत अनेकांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत भाष्य केलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ( शुक्रवारी,६ सप्टेंबर) टीव्ही ९ वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यादरम्यान, त्यांना महायुती जर तुमच्या नेतृत्वात निवडणूक लढवत असेल तर तुम्हाला महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून का घोषित करत नाही, असा प्रश्न विचारण्यात आला. याबाबत बोलताना, आम्हाला मुख्यमंत्री पदासाठी घाई नाही. मी मुख्यमंत्री असलो तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नाही, मुख्यमंत्रीपदाबाबत आम्ही महायुती म्हणून निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा – Devendra Fadnavis : धुसफूस रोखण्यासाठी महायुतीचा मोठा निर्णय; ‘आता तीनही पक्षांच्या…’; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

“मी कधीही मुख्यमंत्रीपदाची अपेक्षा केली नव्हती. मी सतत काम करत राहिलो. काम केल्यानंतर त्याची नोंद जनता ठेवत असते. आजही महायुतीमध्ये मला काय मिळेल? यापेक्षा मी जनतेला काय देऊ शकतो? अशी माझी भूमिका आहे. गेल्या अडीच वर्षात आम्ही जे काम केलं आहे, राज्याचा जो विकास केला आहे, ते जनतेला माहिती आहे. आम्हाला मुख्यमंत्रीपदासाठी कोण कोणतीही घाई नाही. आम्ही वैयक्तिक स्वार्थापेक्षा महाराष्ट्राचा विचार करतो”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

“मुख्यमंत्रीपदाबाबत महायुती म्हणून निर्णय घेऊ”

“आमच्यात कुठेही मुख्यमंत्रीपदासाठी वाद नाही. मी सामाजिक जीवनात मोठं काम केलं आहे. एक सामाजिक कार्यकर्ता ते राज्याचा मुख्यमंत्री झालो आहे. संघर्षातून मी इथपर्यंत पोहोचलो आहे. जेव्हा मला यश मिळालं, तेव्हा मी त्याचे श्रेय सहकाऱ्यांना दिलं आहे, पण जेव्हाही मला अपयश आलं तेव्हा त्याची जबाबदारी मी स्वत: घेतली. मी कधीही श्रेयवादात पडलो नाही. मी मुख्यमंत्री असलो तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नाही, मुख्यमंत्रीपदाबाबत आम्ही महायुती म्हणून निर्णय घेऊ”, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

“मी रडणारा नाही, तर लढणारा व्यक्ती”

अटक होण्याच्या भीतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मातोश्रीवर येऊन रडले होते, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला होता. यावरही मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली. “मी रडणारा नाही लढणारा व्यक्ती आहे. मी मागचा पुढचा विचार केला नाही, सत्तेतून पायउतार होऊन बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी सगळं सोडलं. त्यामुळे पोराठोरांचे प्रश्न मला विचार जाऊ नका”, असे ते म्हणाले.

हेही वाचा – Devendra Fadnavis : एकनाथ शिंदे महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणार? फडणवीसांनी सांगितली NDA ची रणनिती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तानाजी सांवत यांच्या विधानावर म्हणाले…

दरम्यान, तानाजी सांवत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याबरोबर बसताना उलट्या येतात, असं विधान केलं होतं. याबाबत विचारलं असता, “तानाजी सांवत यांना मी सांगितलं, की आपण महायुतीमध्ये आहोत. महायुतीत बेबनाव होईल, असं कुठलंही वक्तव्य करता कामा नये. महायुतीत भांड्याला भांडं लागतं. कुटुंबातही कधीकधी मतभेद होतात. महायुतीत छोट्या-मोठ्या कुरबुरी आहेत, त्या मिटून जातील”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.